अवधूत म्हणाले, नरदेहाची प्राप्ती म्हणजे मोठे घबाड मिळवल्यासारखे आहे म्हणून माणसाने त्याचा त्यागही करू नये किंवा भोगही घेऊ नये. त्याने देहाचा उपयोग करून घेऊन मोक्ष साधना करावी. देहाला त्याचे रक्षण होईल एवढेच भरणपोषण करावे कारण साधनेसाठी धडधाकट देह अत्यंत आवश्यक आहे पण हा समतोल राखणे माणसाला सहजी शक्मय होत नाही त्याची अनेक कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे देह हा षड्विकारांनी भरलेला आहे. त्या एकेक विकारामध्ये आणखी कोटय़वधी अनर्थ आहेत. अग्नीत तुपाच्या धारा पडाव्यात आणि तो आणखी प्रदीप्त व्हावा त्याप्रमाणे त्या विकारात सहा ऊर्मी लागून राहिलेल्या आहेत.
दुसरे कारण म्हणजे देह हेच दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे देहाचे स्तोम माजवले तर दुःख वाढून अखेर महादुःख हेच फळ मिळते. म्हणून देहाची संगती ही निरंतर दुःखदायक असते. हे लक्षात घेऊन त्याची आसक्ती सोडून द्यावी. आता देहाचा उपयोग कसा करून घ्यावा ते सांगतो. विरक्ती म्हणजे निरिच्छपणा मनात बिंबण्याच्या हेतूने देह हा गुरु आहे. जर सुखदुःखाबद्दल आसक्ती कमी झाली तर या देहाच्या साहाय्यानेच अविनाशपदाची प्राप्ती होते. या गुणामुळे देहाला गुरु म्हटले पाहिजे. देह हा उपकार करणारा आहे आणि अपकार करणाराही आहे. त्याचे गुणदोष दोन्ही लक्षात घेतले तर देहाला दोन्ही बाजूंनी गुरुपणा आहे. याचा विचार करून जो चतुर आपले हित साधेल तोच धन्य होय. पण माणसाचा त्याच्या देहाबद्दलचा समज काही वेगळाच असतो. त्यामुळे त्याची दिशाभूल होते. कशी ते सांगतो, तत्त्वदृष्टय़ा माणसाचा देह म्हणजेच मी असा समज अज्ञानामुळे होतो आणि हा समजच त्याला दुःखात अडकवतो. देह म्हणजेच मी हा समज दृढ झाला की, आत्मस्वरूप न दिसता समोरचा संसार खरा वाटू लागतो. दोरी म्हणजे सर्प नव्हे पण भ्रमाने दोरीमध्ये सापाचा भास होतो.
त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूला पिंड-ब्रह्मांड असे वेगवेगळे समजतात. देहाचे मूळ पहावयास गेले तर, ते मृगजळासारखेच वाटते. सर्वत्र भ्रमाचेच राज्य पसरलेले आहे. देह नसताही त्याचा भास होतो, त्याला ‘आरोप’ असे म्हणतात.
आता ‘अपवाद’ म्हणजे अभाव कशाला म्हणतात ते सांगतो. एकाग्रचित्ताने श्रवण कर. देह हा मलिन आहे आणि आत्मा शुद्ध आहे. देह हा पंचभूतात्मक असल्याचे प्रसिद्ध आहे. म्हणून आत्मा पंचमहाभूतांपैकी आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण आत्मा पृथ्वी नव्हे, कारण ती जड आहे. आत्मा जळ नव्हे कारण ते द्रवरूप आहे. आत्मा तेज नव्हे कारण त्याला दाहकत्व आहे. तसाच आत्मा वायुही नव्हे कारण तो चंचळ आहे. आत्मा आकाश नव्हे, कारण ते शून्य आहे. ‘अहं’ ही आत्मा नव्हे कारण ते दृश्य आहे. आत्मा जीव नव्हे, कारण तो एकदेशी आहे. तसाच आत्मा मायाही नव्हे कारण ती मिथ्या आहे. तात्पर्य, या तत्त्वांचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. आत्मा अभिमानही नव्हे कारण अभिमान देहाला असतो. पण आत्मा आत्मरूप असल्याने वर जी तत्त्वे सांगितली त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी ‘अपवाद’ म्हणजे अभाव आहे. हे यदू, हा माझ्या बुद्धीला झालेला बोध मी तुला सांगितला. तुझी अनन्यभक्ती व भावार्थ पाहून हे माझे सारे गुह्य ज्ञान मी तुला सांगितले. एरवी हे मी कुणाला सांगितले नसते. परंतु हे भाग्यवान् राजा! तुझी आस्था पाहून मी हे बोललो. अवधूत आणि यदुमहाराज यांची संवादसुखाची एकतानता झाली आणि दोघेही आनंदातिशयाने ब्रह्मस्वरूपात तन्मय झाले. पुढे अवधूत म्हणाले, या देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही म्हणून तो नीट राखावा म्हणशील, तर तो मुळातच परक्मयाचा आहे. याचे अत्यंत जतन करू म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो. तो कोह्याकुत्र्यांचे किंवा अग्नीचे भक्ष्य होऊन राहतो. तात्पर्य देहाचे जतन करणे आपल्या हातात नाही म्हणून हे राजा! मी देहाच्या प्रेमात रहात नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मला आत्मस्वरूप व देह यातील फरक समजला आहे त्यामुळे मी निःसंगपणाने पृथ्वीवर फिरतो. पुढे अवधूत देहाच्या प्रेमामुळे मनुष्य कसा बंधनात अडकतो ते सविस्तर सांगणार आहेत ते आपण पुढील भागात पाहू…