जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवा : आमदार सुदिन ढवळीकरांचा सरकारला इशारा
प्रतिनिधी / फोंडा
दोनापावला येथे पीपीपी तत्त्वावर होऊ घातलेला कन्वेंशन सेंटर प्रकल्प म्हणजे मोठा घोटाळा असून आयटी खात्याची जमीन अशा प्रकल्पावर फुंकून टाकण्याचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशाची सरकारला अशा प्रकारे उधळपट्टी करता येणार नाही, असा इशारा म. गो नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे. सरकारच्या विविध योजना म्हणजे जनतेची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप करीत सुरुवातीला काँग्रेस व आत्ता भाजपा सरकारने गोमंतकीय जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास केल्याची टिकाही त्यांनी केली.
आपण सार्वजनिक बांधकाममंत्री असताना रु. 8 हजार प्रति चौ. मी. दराने सरकारने ही जमीन विकत घेतली होती. नंतर आयटी प्रकल्पासाठी सरकारने ती हस्तगत केली. साधारण 95 हजार चौ. मी. असलेल्या या जागेचा बाजारभाव आज किमान रु. 50 हजार चौ. मी. आहे. केवळ पाच हजार लोकांसाठी उभारण्यात येणाऱया कन्वेंशन सेंटरसाठी एवढी मौल्यवान जमीन देण्यामागे मोठे गौडबंगाल आहे. सरकारला या प्रत्येक पैशाचा हिशेब जनतेला द्यावा लागेल. या प्रकल्पासाठी कुणी व्यावहार केला व कोणकणत्या कंपन्या त्यात गुंतलेल्या आहेत याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, दुर्भाट च्या सरपंच सरुजा नाईक व माजी सरपंच गणपत नाईक हे उपस्थित होते.
सत्तरीतील सुपिक जमीनीवर नांगर फिरवून व शेतकऱयांचे उत्पन्न कायमचे बुडवून आयआयटी प्रकल्प उभारण्यापेक्षा तो फर्मागुडीत उभारा असे सांगून गोवा अभियांत्रिकी कॅम्पसमध्ये आयआयटीसाठी आधीच रु. 50 कोटी खर्च केलेले आहेत. फर्मागुडीतील दीड लाख चौ. मीटर जागेत वादग्रस्त आयआयटी प्रकल्प हलविण्याची सूचनाही त्यांनी केली.
आत्मनिर्भरपेक्षा आधी नुकसान भरपाई द्या
राज्यातील गरीब जनतेला आत्मनिर्भर योजनेपेक्षा नुकसान भरपाईची अधिक गरज असल्याचे सांगताना, लॉकडाऊनमुळे फुलविक्रेत्यांपासून अन्य छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत असल्याचे ते म्हणाले. कांद्याचे भाव वाढल्याने रेशनकार्डवर दरमाही 3 किलो कांदे देण्याची सरकारने केलेली घोषणा हास्यास्पद असल्याचे आमदार ढवळीकर म्हणाले. अशा योजना राबविण्यापेक्षा गृहिणींचे गृहआधार व ज्येष्ठ नागरिकांचे निराधार योजनेची काही महिने थकलेली रक्कम आदी त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. स्वस्त दरात उपलब्ध होणारा कांदा शेवटी हॉटेल्स व अन्य माध्यमातून काळय़ाबाजारातच जाणार आहे. त्यापेक्षा जनतेची खरी गरज ओळखून त्यांना आर्थिक मदत पुरविण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपाने असा कोणता पराक्रम केला ?
सध्या राज्यात कोरोना बळींचा आकडा सहाशेच्या पुढे गेला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अशा वेळी भाजपा सरकारमधील नेते काणकोण येथे आपला जाहीर सत्कार करून घेऊन जनतेला कोणता संदेश देऊ पाहत आहेत ? सरकारने असा कोणता पराक्रम केला म्हणून ते आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेत आहे, असे टिकेचे आसूडही त्यांनी ओढले. सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी येत्या 15 दिवसात राज्यातील रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपले आश्वासन पाळल्यास विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडू असे आवाहन ढवळीकर यांनी केले.
कोळशाचे कारस्थान काँग्रेस व भाजपाचे
राज्यात कोळसा वाहतुकीच्या व्यवहारात आदी काँग्रेस सरकारने आपले हात काळे करुन घेतले आता भाजपाही त्याची पूनरावृत्ती करीत आहे. त्याला विरोध करणारे मूळ प्रश्न समजून न घेता केवळ त्यावर राजकारण करीत आहेत. कोळशाला विरोध करायचा असेल तर तो थेट वास्को येथूनच झाला पाहिजे. विरोध करताना तो तर्कसंगत असावा असेही ते म्हणाले.
स्वच्छ भारत नितळ गोंय या योजनेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी गरीब जनतेकडून बायोटॉयलेटसाठी सरकारने घेतलेल्या पैशांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पैसे भरुनही हजारो कुटुंबीयांना अद्याप शौचालये मिळालेली नाहीत. सरकारने हे पैसे कुठे गुंतविले याचा हिशेबही त्यांनी मागितला.
आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका जाहीर करा
राज्यातील आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली असून सरकारने या मुद्दय़ावर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी त्यांनी केली. प्रत्येक गोमंतकीय नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे जनतेला कळले पाहिजे. केंद्र सरकारचे अन्न महामंडळ खासगी बँकांकडून 4.6 टक्के व्याजाने 7 हजार 500 कोटी कर्ज घेऊ शकते, मग राज्य सरकारला 6 टक्क्याहून अधिक व्याजावर कर्ज घेण्याची गरजच काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तर जनतेचे सरकार देऊ..
म्हादईच्या प्रश्नावर बोलताना, मगो सरकारच्या कार्यकाळात सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकर व नंतर शशिकलाताई काकोडकर यांनी हा प्रश्न योग्यरित्या हाताळला होता. मात्र त्यानंतर आलेले काँग्रेस व सध्याच्या भाजपा सरकारने म्हादई कर्नाटकला विकल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीच्या काँग्रेस व सध्याच्या भाजपा सरकारने सर्व क्षेत्रात गोमंतकीयांचा भ्रमनिरास व घोर फसवणूक केली आहे. येणाऱया 2022 सालच्या निवडणुकीत जनतेने 21 सीट निवडून आणण्याची हमी दिल्यास मगो पक्ष गोमंतकीयांना खरे जनतेचे सरकार देण्यास बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले.