राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आले होते एकत्र : 27 फेब्रुवारी 1922 रोजी झाली होती ग्रेट-भेट
संजीव खाडे/कोल्हापूर
विसाव्या शतकातील दुसरे दशक संपले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कणखर नेतृत्व करत देश व्यापणाऱया लोकमान्य टिळकांचे महानिर्वाण झाले होते. टिळकयुगाच्या अस्तानंतर गांधीयुगाला सुरूवात झाली होती. अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या जुलमी सत्तेला आव्हान देणाऱया गांधीजींनी हळूहळू स्वतंत्र्य लढÎाची सूत्रे आपल्याकडे घेतली होती. याच काळात 27 फेब्रुवारी 1922 राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा गांधीजी यांची भेट झाली. दिल्लीजवळील कुरूक्षेत्र येथे झालेली ही ग्रेट-भेट ऐतिहासिक होती. दोन्ही महान पुरूष भारतीय समाजाच्या अखंड कल्याणाचे स्वप्न घेऊन नेतृत्व करत होते. त्यामुळे कुरूक्षेत्रावरील भेट भारताच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणावे लागेल.
बहुजन उद्धारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे सर्वव्यापी कार्य बहुश्रुत आहे. कोल्हापूर संस्थानमध्ये त्यांनी केलेले कायदे, राबविलेल्या योजना आणि घेतलेले निर्णय हे रयतेच्या हिताचे होते. सामाजिक समतेचा आग्रह धरत धोरण राबविणाऱया राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीतून घेतलेले निर्णय विकासाच्या प्रक्रियेत दूरगामी परिणामकारक ठरले. त्यांना भारतीय लोकशाहीचा उद्गाता असेही म्हटले जाते. अशा या महान राजाबरोबर स्वातंत्र्य लढÎाचे सर्वव्यापी नेतृत्व करणाऱया महात्मा गांधीजींशी भेट झाली. एक महान राजा होता, तर दुसरा महान नेता होता. दोघांची उद्दीष्टे, स्वप्ने जनहिताच, जनकल्याणाची होती. उद्दीष्टांच्या या धाग्यातून 27 फेबुवारी 1922 रोजीची भेट झाली असावी, असा शाहू आणि गांधी अभ्यासकांचे म्हणणे आहे.
अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज दिल्लीला गेले होते. 16 फेब्रुवारी 1922 रोजी या परीषदेत महाराजांनी मार्गदर्शनही केले. त्यानंतर दिल्ली जवळ असणाऱया कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे शाहू महाराज आणि महात्मा गांधीजींची 27 फेब्रुवारी 1922 रोजी भेट झाली. या भेटीचे संदर्भ देणारी कागदपत्रे आहेत. मात्र दोन महान नेत्यांमध्ये या भेटीवेळी कोणती चर्चा झाली, या बाबतचे संदर्भ मात्र मिळत नाहीत. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्या स्नेह होता. काही मुद्दÎांवर मतभेद असले तरी दोघे महान नेते एकमेकांचा आदर करत. लोकमान्य टिळकांच्या लढÎाला शाहू महाराजांनी मदतही केली होती. वास्तविक कोल्हापूर संस्थान इंग्रजांच्या अंकित होते, तरीही शाहू महाराज स्वातंत्र्य चळवळीला छुपी मदत करत असत. भारतीय स्वातंत्र्याला त्यांची अदृश्यरूपाने पाठबळ होते. त्यातच सामाजिक समतेचा त्यांचा लढा त्याकाळी साऱया देशभर चर्चेचा विषय होता. त्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीत राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेचा विचार मांडणारे महात्मा गांधीजी आणि सामाजिक समतेचे आग्रही राजर्षी शाहू महाराज यांची भेट झाली असावी, असे मत शाहू आणि गांधी अभ्यासक असणारे कोल्हापूरचे उमेश सूर्यवंशी मांडतात.
कुरूक्षेत्रावरील या दोन महान नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली असावी? याबाबतची माहिती मात्र मिळत नाही. दोन्ही नेत्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांची चर्चा, संवाद काळाच्या उदरात गडप झाला. तरीही काही अभ्यासकांनी कयास मांडला आहे. दोन्ही महान नेते बहुजनहितैषी आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी भूमिका घेत कार्य करणारे होते. त्यामुळे त्यांच्यात बहुजन विकासावरच चर्चा झाली असावी. त्यावर नजीकच्या काळात प्रकाश पडेलही पण दोन्ही नेत्यांची भेट ग्रेट-भेट होती हे मात्र निश्चित.
ऐतिहासिक भेटीची 2022 मध्ये शताब्दी
27 फेब्रुवारी 1922 या दिवशी शाहू महाराज आणि गांधीजी यांची भेट झाली. त्यानंतर पुढे 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. भेट आणि महाराजांचे जाणे या घटनांना पुढील वर्षी 2020 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील. शाहू महाराजांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर कदाचित शाहू-गांधी विचारातून समतेच्या लढÎाला आणखीन बळ मिळाले असते.
महात्मा गांधी, कस्तुरबा गांधींचा कोल्हापूर दौरा
1927 मध्ये महात्मा गांधीजी आपल्या पत्नी कस्तुरबा गांधींसह कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांनी खासबागेत भाषण केले होते. तपोवनला भेट दिली होती. भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये कस्तुरबा गांधी यांनी महिलांना मार्गदर्शन केले होते. आज कोल्हापूरमध्ये गांधीजींचे पुतळे आहे, गांधी मैदान आहे आणि विद्यापीठ हायस्कूलमधील चौकाला कस्तुरबा गांधींचे नाव आहे. आजही गांधीजींचे पणतु तुषार गांधीनीही कोल्हापूरशी स्नेह जपला आहे.