सरसंघचालक मोहन भागवतांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / बिलासपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू धर्म अन् धर्मांतराच्या मुद्दय़ावर केलेले विधान चर्चेत आले आहे. ‘हिंदू धर्म कुणाचीही पूजेची पद्धत, प्रांत किंवा भाषा न बदलता व्यक्तीला सद्वर्तनाचे शिक्षण देत’ असल्याचे म्हणत सरसंघचालकांनी हिंदू धर्मासाठीची स्वतःची व्याख्या उपस्थित समुदायासमोर मांडली आहे. विश्वगुरु भारताच्या निर्माणासाठी सगळय़ांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
छत्तीसगडमधील मुंगेली जिल्हय़ाच्या मदकू येथे आयोजित ‘घोष शिबिरा’त ते बोलत होते. आम्ही कोण आहोत, आम्ही जगतसत्य जाणणाऱया ऋषी-मुनींचे वंशज आहोत, आम्ही संपूर्ण जगाला स्वतःचे कुटुंब मानणारे लोक आहोत. आपल्या वर्तनातून हेच सत्य आपल्याला सगळय़ा जगासमोर मांडायचे आहे. आम्ही पुन्हा देश-विदेशात, संपूर्ण जगभरू फिरू आणि तोपर्यंत विज्ञानाच्या मदतीने चंद्र अन् मंगळावर पोहोचलो असल्यास तिथेही जाऊ असे म्हणत भागवत यांनी हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारावर जोर दिला आहे.
हरवलेले व्यवहाराचे संतुलन परत देणारा हा धर्म आहे. पर्यावरणाच्या साथीने राहणे हा धर्म शिकवतो, पंथ-पूजा, जातपात, जन्म, देश, भाषा इत्यादी वैविध्यानंतरही एकत्र राहण्यास शिकवतो. कुणाची पूजेची पद्धत न बदलता, प्रांत किंवा भाषा न बदलता व्यक्तीला चांगले वागण्याचे शिक्षण देतो. जो सगळय़ांना आपलं मानतो, कुणालाच परकं समजत नाही, असा जो हा हिंदू धर्म आपल्याला सगळय़ा जगापर्यंत पोहचवायचा आहे. मतांतरण करायची नाही, ही पूजेची पद्धत नव्हे तर जगण्याची पद्धत आहे. सगळय़ा जगापर्यंत हा धर्म पोहचवण्यासाठी आम्हा सर्वांचा जन्म भारतात झाल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
दुर्बल असलेल्यांना जग दडपण्याचा प्रयत्न करते. दुर्बलता हेच पाप असल्याचे स्वामी विवेकानंद म्हणायचे. शक्तिशाली होणे याचा अर्थ संघटित होणे असा होतो. एकटा व्यक्ती कधीच शक्तिशाली होऊ शकत नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करू, आम्हाला कुणालाही बदलण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.