बेंगळूर / प्रतिनिधी
धर्मांतर समाजासाठी चांगले नसून मागास आणि दबलेल्या लोकांनी त्यास बळी पडू नये. त्यांचे सरकार राज्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. या कायद्याने ख्रिश्चनांना लक्ष्य करण्याचा हेतू नाही. असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
तथापि, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की धर्मांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात सर्वच धार्मिक समुदायांच्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही. “हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि शीख हे संविधानाने मान्य केलेले धर्म आहेत आणि लोकांना प्रार्थना करण्यास किंवा त्यांच्या संबंधित धर्माचे पालन करण्यास कोणतीही अडचण नाही. तथापि, एखाद्याच्या गरिबीचा गैरवापर करून त्यांना त्यांची श्रद्धा बदलण्याचे आमिष दाखविण्यास कायद्यामध्ये वाव नाही,” बोम्माई यांनी सांगितले
मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यापासून धार्मिक धर्मांतर हा नेहमीच चर्चेचा विषय होता आणि अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदे आणले आहेत. बंगळूरच्या आर्कडायोसीससह अनेक ख्रिश्चन संघटनांनी या प्रस्तावित धर्मांतर विरोधी विधेयकाला विरोध केला आहे.