प्रियंका वड्रा यांची उत्तरप्रदेशात जाहीर सभा
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तरप्रदेश पक्ष प्रभारी प्रियंका वड्रा यांनी रविवारी जनतेला धर्म आणि जातीच्या नावावर मते मागणाऱया नेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. वड्रा यांनी रायबरेलीच्या जगतपूरमध्ये प्रचारसभेला संबेधित करत जनतेला स्वतःच्या अधिकारांसाठी जागरुक होण्याचे आवाहन केले.
एकीकडे राज्यात कौशल्य आहे, युवक-युवती आहेत, सुपीक जमीन आहे, तर दुसरीकडे शेतकऱयांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, दलितांवर अत्याचार आहे. सध्याचे राजकारण केवळ लोकांची दिशाभूल करणारे असल्यानेच हे घडत असल्याचे प्रियंका म्हणाल्या.
स्वतःचे काम नेमके काय हेच सध्याच्या नेत्यांना समजत नाही. 5 वर्षांनी लोकांसमोर जात धर्माबद्दल बोलू, लोकांच्या भावनांना हात घालू, त्यांच्यात असुरक्षित असल्याची जाणीव निर्माण करू, जातीचा मुद्दा उकरून काढत मते मिळवू असेच या नेत्यांना वाटतेय. जर आपण काम केले नाही, छोटय़ा दुकानदारांना मदत न केल्यास, रस्ते तयार न केल्यास, शैक्षणिक संस्था न उभारल्यास मते मिळणार नाही हा विचारच तो करत नाही. धर्म, जातीच्या नावावर मते मिळतील याचा विश्वास या नेत्यांना असल्याचा दावा वड्रा यांनी केला.
पश्चिम उत्तरप्रदेशात ऊसाला योग्य दर मिळत नाही. तसेच येथे भटक्या प्राण्यांची सर्वात मोठी समस्या असून ते पिकांची हानी करत आहेत. लोकांना एक पोती धान्य देत असल्याचे सरकार सांगतेय, परंतु त्याहून अधिक प्रमाणात प्राणी शेतांमध्ये पिक फस्त करत असल्याचे म्हणत वड्रा यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.