परिसरातील समस्यांकडे महापालिका-रेल्वे खात्याचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड रोड येथील रेल्वेफाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पण उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर या परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी सर्व्हिस रोडची समस्या जैसे थे आहे. अशातच उड्डाणपुलाच्या पथदीपाकरिता घालण्यात आलेली विद्युतवाहिनीची लोखंडी पाईप अपघातास कारणीभूत ठरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर परिसरातील सर्व्हिस रोडच्या विकासाकडे महापालिका आणि रेल्वे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे खात्याने उड्डाणपुलाच्या देखभालीकडे कानाडोळा केला आहे. उड्डाणपुलावर ठिकठिकाणी लोखंडी पट्टय़ा घालण्यात आल्या आहेत. पण सदर पट्टय़ा सुटल्या असून वाहनधारकांना धोकादायक बनल्या आहेत. सर्व्हिस रोडच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले असून पुलाशेजारी रस्त्यावरील लोखंडी जाळीच्या सळय़ा उघडय़ा पडल्या आहेत.
तसेच रुपाली हॉलजवळ उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराजवळ लोखंडी पाईप दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना डोकेदुखीची बनली आहे. उड्डाणपुलावर पथदीप बसविण्याकरिता विद्युतवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. विद्युतवाहिनी घालताना प्रवेशद्वारावर लोखंडी पाईपचा वापर केला होता. तसेच त्यावर सिमेंट काँक्रिट घालण्यात आले होते. पण सदर पाईपवरील सिमेंट उखडल्याने लोखंडी पाईप व विद्युतवाहिनी उघडी पडली आहे. त्यामुळे परिसरात वळणाऱया वाहनांना अडचणीचे ठरत आहे.
विशेषतः उड्डाणपुलावर जाताना किंवा उड्डाणपुलावरून डावीकडे वळताना लोखंडी वाहिनीवरून दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे याठिकाणी दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच याठिकाणी चारचाकी वाहनेदेखील अडकून पडत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. याठिकाणी उघडय़ावर असलेल्या वाहिनीमुळे अपघात होत असल्याने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.