प्रतिनिधी/ वास्को
गोवा राज्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक आणि मुरगावच्या उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर यांच्यामध्ये जबरदस्त खटके उडण्याचा प्रकार सकाळी सकाळीच उघडकीस आला. फोनवरून झालेली ही खडाजंगी समाज माध्यमांवर वायरल झाल्याने हे वृत्त लगेच गोवाभर पसरले. या खडाजंगीची चर्चा दिवसभर होती. यात काहींचे मनोरंजन झाले, काहींना आश्चर्याचा धक्का बसला तर काहींना वाईटही वाटले.
खटके आणि खडाजंगी होण्याचे मुख्य कारण होते, पालिका मजूर. मुरगाव पालिकेत सत्तेवर येणारा प्रत्येक गट विरोधी गटाला मजूर पुरवत नसल्याचा आरोप प्रत्येक वेळी होत असतो. आताही तो होत आहे. मुरगावच्या उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर यांच्यावर पालिका क्षेत्रातील प्रभागांना मजूर वाटून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे रिमा सोनुर्लेकर सध्या विरोधी गटाचे लक्ष्य बनलेल्या आहेत. पालिकेतील विरोधी गट नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचा समर्थक गट आहे. सफाईच्या कामासाठी मजूर उपलब्ध होण्यास अडचणी येतात याचा अनुभव खुद्द राज्याचे नगरविकासमंत्री असलेल्या मिलिंद नाईक यांनाही सोमवारी सकाळी आला. रिमा सोनुर्लेकर मजूर उपलब्ध करण्यास आडकाठी आणीत असल्याचे मंत्र्यांना समजले आणि त्यांनी थेट सोनुर्लेकर यांनाच फोन केला. त्यानंतर फोनवर खटक्यावर खटके उडू लागले. हे खटके शेवटी वायरल झाले आणि मंत्री विरोधकांनाही आयतेच कोलीत मिळाले.
उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर बोलण्यात तशा स्पष्टवक्त्या आहेत. या स्पष्टवक्तेपणाचा जबरदस्त अनुभव नगरविकासमंत्र्यांनाही आला. फोनवर मंत्री उपनगराध्यक्षांना जाब विचारतात, आपणाला मजूर हवेत त्यांना अडवू नको अशी ताकीदही देतात. रिमा विचारतात किती दिवसांसाठी, मंत्री म्हणतात सहा महिन्यांसाठी , मग इतरांनी काय करावे, इतर नगरसेवकांचे मला लागत नाही. मी मंत्री आहे. मला मजूर हवेत. तर मग सारेच मजूर तुमच्या घरी घेऊन जा ना अशी सुचना सोनुर्लेकर करतात. शेवटी प्रकरण तू तू मै मै वर येते. बघून घेऊ अशी भाषा बोलली जाते. तसे मी नाही तू म्हटले असाही दावा होतो. देवळात येऊन नारळावर हात ठेव असे आव्हान मंत्री उपनगराध्यक्षांना देतात. सोनुलेंकर मंत्र्यांना भाई म्हणतात परंतु अरे तुरे च्याही फैरी झडतात. एकमेकांची शिस्तही काढली जाते. तु कोण आहेस, तुझ्याकडे काही मागण्याची मला गरज नाही असे शब्द कानी पडताच तुम्ही मंत्री आहात आणि मी कोणी नाही तर मला का फोन करता असा प्रश्न सोनुर्लेकर करतात. तुम्ही मला आतापर्यंत किती वेळा फोन केला आणि मी किती वेळा सांगितलेले काम केले याचा उल्लेख सोनुर्लेकर फोनवर करतात तेव्हा त्यांच्या शब्दात आपण मंत्र्याचे काम केल्याचा गर्वच व्यक्त होतो. फोनवरील हे खटके, खडाजंगी किंवा शाब्दीक चकमक तब्बल पंधरा मिनिटे चालते. शेवटी मंत्रीच सोनुर्लेकर यांना मजूरांना अडवू नको अशी विनंती करतात आणि माफीही मागत असल्याचे ऐकू येते. परंतु सोनुर्लेकर त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसते. नगरविकासमंत्री आणि उपनगराध्यक्ष यांच्यामधील हा गरमागरम संवाद दिवसभर लोकांनी चवीने ऐकला. पातळी कोणी सोडली व कोणी राखली हे कळायला मात्र मार्गच नव्हता.