चिपळूण महाविकास आघाडीचे सुधीर शिंदे, अविनाश केळसकर यांची टिका, अर्थसंकल्पाला मंजुरी असतानाही नागरिकांची करताहेत दिशाभूल, योग्यवेळी नागरिक जागा दाखवतील असा व्यक्त केलाय विश्वास
प्रतिनिधी / चिपळूण
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचा संपर्क दौरा हा खोटे बोलून सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी नाही त्यामुळे विकास थांबला असल्याचे त्या नागरिकांना सांगत आहेत. मात्र नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे वेळ आली की ते नगराध्यक्षांना जागा दाखवतील, अशी टीका महाविकास आघाडीचे सुधीर शिंदे व अविनाश केळसकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, नगराध्यक्षांचा हा शेवटचा संपर्क दौरा आहे. त्यामुळे त्यांना जितके खोटे बोलायचे आहे, तितके त्यांनी बोलून घ्यावे. अर्थसंकल्पाला आघाडीची मंजुरी नसल्याने विकास थांबला आहे, असे सांगून त्या नागरिकांची दिशाभूल करत आहेत.
केळसकर यांनी म्हटले आहे की, 26 मे 2019 रोजी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. मात्र वाढीव खर्चाला आमचा आक्षेप आहे. कारण स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी अनेक नियम धाब्यावर बसवले आहेत. जर अर्थसंकल्पाला मंजुरी नाही तर एप्रिल महिन्यापासून ठेकेदारांची 5 कोटींची बिले कशी दिली. याच्यासह वाढीव खर्चाला आमची मंजुरी का नाही, हेही सांगावे. माझ्या प्रभागात कामे झालेली नाहीत, असे त्या नागरिकांमध्ये बिंबवत आहेत. मात्र मी 7 वर्षापूर्वी करून घेतलेले रस्ते आजही चांगले असून यांनी केलेले रस्ते वर्ष दीड वर्षात उखडत आहेत. नगराध्यक्षांच्या काळात सर्व प्रकल्प अर्धवट असून शहरात मच्छी बाजार झाला आहे. त्यामुळे कुत्री पिसळून नागरिकांना चावा घेत असून अतिक्रमणही वाढले आहे. 58/2 चा गैरवापर केला की नाही हे त्यांनी सागण्याची गरज नसून ते लवकरच सिध्द होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे….