वाळवा / वार्ताहर
धरणग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, या प्रश्नांना सरकार पाठीशी घालत नाही ? या धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही ! अधिकारी निराशाजनक कामगिरी करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये धरणग्रस्तांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून नजीकच्या काळात धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न निकाली काढणार आहे. जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत आपण धरणग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे प्रतिपादन वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना सांगली व कोल्हापूर जिल्हा मार्गदर्शक गौरव भाऊ नायकवडी यांनी केले, ते दै. तरुण भारतशी वार्तालाप करीत असताना बोलत होते.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्त विस्थापित झालेले आहेत, त्यांचे अनेक जमिणींचे व घरांचे प्रश्न प्रलंबित आहेत, आर्थिक तरतुदींचेही प्रश्न प्रलंबित आहेत, तिकडे लोकप्रतिनिधी ढुंकूनही पहायला तयार नाहीत, निवडणुका जिंकल्यानंतर धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते व आहे, परंतु तसे होताना दिसत नाही, परंतु आपण धरणग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे गौरव नायकवडी यांनी सांगितले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणग्रस्तांसाठी आपण पायात भिंगरी बांधून आत्तापर्यंत काम केले आहे.
धरणग्रस्तांसाठी आयुष्य वेचलेले नेते पद्मभुषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा आदर्श घेत इथून पुढेही हे प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी दै. तरूण भारत जवळ सांगितले आहे. धरणग्रस्तांच्या पाठीशी लढवय्ये युवा नेते गौरव नायकवडी ठामपणे उभे राहिल्यामुळे धरणग्रस्त कुटूंबांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नजीकच्याकाळात आपल्याला न्याय मिळेल, ही भावना धरणग्रस्त व्यक्त करताना दिसत आहेत.
सांगली कोल्हापुरमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने व युवा नेते वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना सांगली व कोल्हापूर जिल्हा मार्गदर्शक गौरव नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची विविध प्रलंबित प्रश्नावरती बैठक संपन्न झाली, या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हा अधिकारी गोपीचंद कदम, पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी पाटबंधारे, व वन्यजीव विभागाचे प्रमुख अधिकारी व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी मुसाभाई मुल्ला, श्रीपती पाटील, राजाराम पाटील, सुरेश नांगरे, सुरेश जाधव, अंकुश सावंत, दिपक सोनवणे, आदी धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.