ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायती
राज दिनानिमित्त व्हिडिओ कॉनफरन्सद्वारे जनतेशी संवाद साधला. त्याच बरोबर पंतप्रधानांनी नवीन ई – गाव स्वराज पोर्टल आणि ॲपचे उद्घाटन देखील केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्या संबधित माहिती आता एकच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संकट आपल्याला स्वावलंबी बनवत आहे. आता स्वावलंबी होणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे ते म्हणाले, या संकटामुळे प्रत्येकाच्या कार्य पद्धतीत बदल झाला आहे. आता आपण समोरासमोर बोलू शकत नाही. पंचायती राज दिन ही स्वराज गावात आणायची संधी आहे. या संकटकाळी त्याची गरज वाढली आहे.
पुढे ते म्हणाले, गावातील लोकांनी मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेतले नसले तरी या परिस्थितीत गावाकडील लोकांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. या संकटाचा सामना करताना बरेच काही करून दाखवले आहे. गावातून येणारे आकडे हे देशाला प्रेरणा देणारे आहेत. देशाला प्रेरणा देण्याचे काम गावातील जनतेने केले आहे. या संकटाच्या काळात गावकऱ्यांनी जगाला मोठा संदेश दिला आहे. ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स नाही तर ‘दो गज दूरी’ असा संदेश दिला.
स्वामित्व योजनेबद्दल बोलताना मोदी म्हणाले, जी वेबसाईट केली आहे त्याद्वारे गावांना माहिती पोहचवणे आणि मदत करणे अधिक वेगवान बनेल. तसेच आता ड्रोनद्वारे गावाचे मॅपिंग केले जाईल. तर बँकेकडून ऑनलाईन मदत होईल. याची सुरुवात महाराष्ट्रासह अने सात राज्यातून केली जात आहे. त्यानंतर ती प्रत्येक गावात नेली जाणार आहे. असे ही मोदींनी यावेळी सांगितले.