कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने सर्व क्षेत्रांवरील मळभ हळूहळू दूर होत आहे. साहित्याचेही नभांगण आता मोकळे होत असून, संमेलनाचे पडघम वाजू लागले कोरोनानंतरचे पहिलेवहिले म्हणजेच 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असून, या संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील या संमेलनामुळे साहित्य क्षेत्रासह मरगळलेल्या मनांना नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
संमेलन म्हणजे साहित्याचा उत्सव. या माध्यमातून साहित्यिकांनी विविध साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच प्राप्त होते. संमेलनातून मराठी माणसाच्या विचारांची भूक भागवली जाते. त्यामुळे साहित्यप्रेमी साहित्य संमेलनाची अतुरतेने वाट पाहत असतात. स्वाभाविकच कोरोनाच्या महामारीनंतर होणारे हे साहित्य संमेलन दरवर्षीपेक्षा वेगळे आणि महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आज कमी झाला असला, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे संमेलनाची रुपरेषा काय असणार, कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचे, याचे आव्हान आयोजकांपुढे असणार आहे.
साहित्य संमेलनासाठी संमेलनासाठी नाशिकची दोन, तर सेलूचे, पुण्याचे (दिल्लीसाठी) आणि अंमळनेरचे प्रत्येकी एक अशी निमंत्रणे आली होती. साहित्य संमेलन दिल्लीला व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. दिल्लीला साहित्य संमेलन व्हावे, याकरिता एका खासगी संस्थेने प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्रातल्या दिल्लीत असणाऱया राजकारण्यांना खूष करण्यासाठी दिल्लीमध्ये संमेलनाचा घाट घातला जात आहे, असा आरोपही करण्यात येत होता. अखेर स्थळ निश्चिती झाल्यावर संमेलन नाशिकला होणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी घोषित केले. त्यावरूनही टीकाटिप्पण्याही झाल्या. मात्र, संमेलन महाराष्ट्रातच होत असल्याने साहित्य वर्तुळातून कौतुकही करण्यात आले. दुसरीकडे दिल्लीला विशेष साहित्य संमेलन घ्यायचा प्रस्तावही महामंडळाने ठेवला होता. पण, तो नंतर संबंधित खासगी संस्थेने नाकारला. आता संमेलन नाशिकला होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.
24 जानेवारीला ठरणार संमेलनाची रुपरेषा : ठाले-पाटील
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, 24 जानेवारीला महामंडळाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये नाशिक येथे होणाऱया संमेलनाची पूर्ण रुपरेषा आखली जाणार आहे. तिथे कसे वातावरण असेल, त्यावर नवीन प्रयोग करायचे ठरविले जाईल. उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये काही प्रमाणात आम्ही नवीन प्रयोग केले होते. कोरोनामुळे छपाई थांबली, वाचकांपर्यंत पोहोचता आले नाही. माणसांपर्यंत पोहोचता यावे म्हणून साहित्य महामंडळ काहीतरी करत आहे. संमेलन हा साहित्य महामंडळाने केलेला प्रयोग आहे. लोकांच्या नजरेत तो कसा बसतो, हे महत्त्वाचे आहे.
ग्रंथविक्रीला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा : सुनीताराजे पवार
संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच दिवस सगळेच ठप्प झाले होते. नाशिकमध्ये संमेलन होत आहे. त्यामुळे पुस्तक विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. खूप वर्षांनी नाशिक शहरात संमेलन होत आहे. सोशल डिस्टन्स पाळून हे सगळे करावे लागणार आहे. किती स्टॉल्स असणार आहेत, हेही पाहायला लागणार आहे. अजून संमेलनाला वेळ असल्याने काही चित्र स्पष्ट नाही झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अजून आपण खुल्या मनाने स्वीकारू शकत नाही. शेवटी साहित्यप्रेमींच्या आरोग्य व हिताचा विचार करूनच या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
सासणे, भवाळकर, नारळीकरांची नावे चर्चेत
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता सन्मानाने निवड करण्यात येते. नाशिकच्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक जयंत नारळीकर, भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची नावे चर्चेत आहेत.
साहित्य संमेलन आणि वाद
साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वादाची किनार ही साहित्य संमेलनाला असते. यवतमाळ साहित्य संमेलनाच्यावेळेस ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या सहभागावरून वादळ उठले होते. तर मागच्या वर्षी उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरूनही वादळ उठले होते. विविध राजकीय पक्षांचा हस्तक्षेपही संमेलनामध्ये अडथळा ठरताना बऱयाचदा दिसून येतो. गतवर्षी मात्र सर्व राजकीय व्यक्ती या प्रेक्षकांमध्ये बसून संमेलनाचा आनंद घेताना दिसल्या. स्वाभाविकच नाशिकचे संमेलन कसे पार पडणार, वादविवादांना मूठमाती मिळून निखळ साहित्यविषयक बाबींची चर्चा होणार का, परिसंवादातून ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होणार का, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष असेल. साहित्यमेळय़ातील कविसंमेलन, कविकट्टा हा रसिकांच्या नेहमीच जिव्हाळय़ाचा विषय राहिला आहे. या कवितांमध्ये अनेकदा जीवनमरणाच्या प्रश्नांवर कवी मंडळी अभिव्यक्त होत असतात. कोरोना महामारीत सर्वसामान्यांसह सगळय़ांनाच अनेक प्रश्नांशी झुंजावे लागले. मानवी जीवनात मोठी उलथापालथ घडून जगण्याचे सारे संदर्भच बदलून गेले. त्याचे प्रत्यंतर कवितेतही उमटण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे सोशल मीडियामुळे जग अधिक जवळ येत चालले आहे, असे म्हटले जाते. त्याचाच आधार घेत विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाईन विश्व मराठी संमेलन होत आहे. यानिमित्ताने जगभरातील मराठी लोक एकत्रित येणार आहेत. संपूर्ण जगातील एकाच भाषेतील लोक एकत्रित येण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. या संमेलनाच्या निमित्ताने 5 पद्मभूषण, 3 महाराष्ट्रभूषण एकत्रित येत आहेत.
याबाबत परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. क्षितीज पाटुकले म्हणाले, या संमेलनामध्ये 35 देश, अमेरिकेतील 50 राज्ये, भारतातील 25 राज्यातील बृहन् महाराष्ट्र मंडळे सहभागी होणार आहेत. 1200 हून अधिक महाविद्यालये, 800 शाळा, 500 हून अधिक वाचनालये आणि 150 हून अधिक संस्था सहभागी होणार आहेत. या संमेलनात कौतुक, उत्सव साजरे न करता त्या-त्या व्यक्तींशी फोनवरून थेट संपर्क करता येणार आहे. संमेलनासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीचे, संस्थेचे अनुदान घेतलेले नाही. हे संमेलन पूर्णपणे लोकाश्रयावर करण्यात येणार आहे.
नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ, एक महासंमेलनाध्यक्ष
या संमेलनामध्ये नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ असणार आहे. तर एक महासंमेलनाध्यक्ष असणार आहे. प्रत्येकाला भारतातून एक आणि भारताबाहेरील एक अध्यक्ष असणार आहे. महासंमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ, एक महासंमेलनाध्यक्ष अशी संमेलनाच्या इतिसातील प्रथमच घटना आहे, असेही प्रा. पाटुकले यांनी नमूद केले.
संमेलनात प्रथमच ‘शेतकरी कट्टा’
संमेलनाच्या निमित्ताने ग्रामीण कलांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संमेलनात पहिल्यांदाच ‘शेतकरी कट्टा’ घेण्यात येणार आहे. तसेच आयडिया कट्टा, युवा कट्टा, वडिलधारे कट्टा, साहित्य कट्टा होणार आहे. यामध्यशे जगभरातील 28 संस्था सहभागी होणार आहेत. 20 देशातील दुतावासांचे काम करणारे मराठी अधिकारीही सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून वैश्विक मराठी ब्रँड रुजविण्याचा संकल्प असल्याचे प्रा. पाटुकले यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुन्हा जिवंतपणा येणार…
कोरोना संसर्गाच्या काळात विविध साहित्यिक उपक्रम ऑनलाईन, फेसबुक लाईव्ह किंवा व्हर्च्युअल पद्धतीने सुरू होते. चर्चासत्रे, संमेलने, काव्यकट्टा, कथावाचन असे विविध उपक्रम राबविण्यात साहित्यिक मंडळी कुठेही कमी पडलेली नाही. कोरोना संसर्गाच्या भीतीमय वातावरणात साहित्यप्रेमींनी अशा कार्यक्रमांना पूर्वीइतक्याच प्रेमाने दादही दिली. पण, साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी भेटी-गाठी किंवा प्रत्यक्ष चर्चासत्रे, सुसंवाद यासारख्या घडामोडींना तेज मिळू शकले नाही. आता नजिकच्या काळात असे कार्यक्रमही सुरू होताच साहित्यप्रेमी पूर्वीप्रमाणेच मनमोकळय़ा वातावरण साहित्याचा आस्वाद अगदी जवळून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नसावी.
व्यासपीठे गजबजणार
महाराष्ट्राच्या विविध भागांत मुख्य संमेलनाशिवाय अनेक संमेलने होत असतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत होणाऱया या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होते. तर रसिकांनाही साहित्याचा आस्वाद घेतो. परंतु, मार्चपासून कोणतेही संमेलन पार पडू न शकल्याने साहित्यिक आणि रसिक या दोन्ही घटकांना त्यापासून वंचित रहावे लागले. जवळपास दहा ते अकरा महिन्यांच्या या काळात केवळ साहित्याचे वाचन हाच पर्याय सर्वांसाठी उपलब्ध राहिला. या कालावधीत पुस्तकांची मागणी व वाचन या दोहोंमध्ये निश्चितच वाढ झाली. वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे म्हणतात. ही समृद्धी घेऊन साहित्य शिवारात बागडण्यासाठी रसिक आता नक्कीच आतूर असतील. नव्या वर्षांत गोदाकाठाबरोरच ऑनलाईन विश्वाची सफर रसिकांना होईलच. शिवाय नववर्षामधील महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील छोटय़ा-मोठय़ा संमेलनातूनही रसिकजनांना नवे चैतन्य, नवा आनंद मिळेल, हे निश्चित. – सुकृत मोकाशी, पुणे