ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मात्र, सोमवारी हरियाणातील काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन नवे कृषी कायदे मागे न घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी यासंदर्भात पत्रही तोमर यांना दिले आहे.
हरियाणातील या शेतकरी संघटनांनी नवीन कृषी कायद्यांमध्ये काही बदल करण्यासाठी सूचना केल्या आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्याऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही प्रगतीशील शेतकरी संघटना, सेनीपतचे अध्यक्ष कंवलसिंग चौहान यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी सुधारणा कायदे मागे घ्या, शेतमालास किमान आधारभूत मूल्य लागू असलेला कायदा करा, या प्रमुख मागण्यांसाठी मागील बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणासह अन्य राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली असून, अनेक राज्यात बंद पाळण्यात येत आहे.