बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लवकरच ते आपल्या नवीन मंत्र्यांसोबत कामाला लागतील. दरम्यान, नवीन मंत्रिमंडळ केव्हा स्थापन होणार याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखालील नवीन मंत्रिमंडळ एका आठवड्यात स्थापन होऊन शपथ घेईल, असे त्यांनी सांगितले.
बोम्माई यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना नलिनकुमार कटील म्हणाले की राज्य मंत्रिमंडळात मंत्र्यांची नेमणूक करणे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून राहते. “ते भाजप हाय कमांडशी सल्लामसलत करून निर्णय घेतील,” असे ते म्हणाले. तसेच इतर पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेता येईल का या संदर्भात ते म्हणाले की हाय कमांड निर्णय घेईल.
दरम्यान, कॉंग्रेस-जद (एस) युतीमधून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल झालेल्या एम. टी. बी. नागराज यांनी म्हटले आहे की त्यांना विश्वास आहे की पक्ष आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा त्यांचे वचन पूर्ण करतील आणि ज्यांनी कॉंग्रेस आणि जद (एस) मधून सामील झालेल्यांना पुढे मंत्रिपद कायम ठेवतील असा विश्वास आहे.