स्वातंत्र्यानंतर आपण प्रथमच फार मोठय़ा आव्हानात्मक कालखंडातून वाटचाल करीत आहोत. कोरोनाच्या भीषण सावटाखाली यंदाचा स्वातंत्र्यदिन पार पडत आहे. कोरोना विषाणूने सगळय़ा जगालाच घाईला आणले आहे. आपणही न दिसणाऱया या शत्रूशी गेले काही महिने झुंज देत आहोत. वास्तविक स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्याची प्रचंड उर्मी प्रत्येकाच्या मनात असते. परंतु यावर्षी आतमध्ये कुठेतरी नकळत एक प्रकारची वेदना जाणवते आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेली भयाण परिस्थिती त्याला कारणीभूत आहे.15 ऑगस्ट हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण. दरवर्षी तो देशात धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, गोडधोड वाटपामुळे एकप्रकारचे भारलेले वातावरण असते. यंदा मात्र ’दो गज की दूरी’ चा नियम आणि जोडीला मास्क, सॅनिटायझर, थर्मल क्रीनिंग, मेडिकल बूथ, ऍम्ब्युलन्स असे चित्र स्वातंत्र्यदिन सोहळय़ाच्या ठिकाणी प्रथमच पहायला मिळेल. अत्यंत निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर तिरंगा फडकेल. झेंडावंदनाची परंपरा जवळजवळ पाऊणशे वर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळही त्याला अपवाद ठरला नाही. यंदादेखील लाल किल्ल्यासह देशात सर्वत्र तिरंगा फडकत आहे. कोरोना, सीमेवरील वाढता तणाव, मंदावलेली अर्थव्यवस्था यासारख्या संकटांनी देशाला घेरले आहे. परंतु डौलाने फडकणारा तिरंगा निराशेची किरणे पळवून लावेल. आशेची नवी किरणे घेऊन येईल. नव्या उर्मीने प्रगतीच्या व स्थैर्याच्या दिशेला घेऊन जाईल. कारण त्याला एका समग्र आणि खंबीर लढय़ाची पार्श्वभूमी आहे. कोणतीही संकटे समस्या घेऊन येतात तशीच ती नाना प्रकारच्या संधीही घेऊन येतात. भारताचा विचार केल्यास आशेची नवी प्रतिबिंबे जागतिक पटलावर पडलेली दिसत आहेत. कोरोनाने जागतिक समीकरणे बदललेली आहेत. यातून चीन विरुद्ध उर्वरित जग अशी मांडणी आकारास आली. यापूर्वी जगातील प्रगत देशातील उद्योगांचे पाय चीनमध्ये पसरले होते. उद्योग-व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करून जगातील बडय़ा कंपन्यांना चीनने आकृष्ट केले होते. परिणामी जगभरात चीनच्या माध्यमातून उत्पादन पुरवठय़ाची मोठी साखळी तयार झाली होती. बघता बघता चीन जगातील दोन नंबरची आर्थिक महासत्ता बनला. पण कोरोनामुळे त्याची लबाडी उघड झाली. विश्वासघातकी आणि सारखा फुत्कार टाकणाऱया चीनपेक्षा भारत आता सर्वांना जवळचा वाटू लागला आहे. कोरोनाने चीनची पुरवठा साखळी तोडली. त्यामुळे पुरवठय़ाचा समतोल पुन्हा साधणे आवश्यक बनले आहे. बहुतांश बडय़ा उद्योगांनी चीनमधून काढता पाय घेतला असून त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी नव्या पोषक भूमीची आवश्यकता आहे. भारताचे दार ते ठोठावत आहेत. संशोधन विकास, विज्ञान-तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देत आपण या संधीचे सोने करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतर आपली अर्थव्यवस्था प्रथमच इतकी डबघाईला आली आहे. उद्योगाबरोबरच 14 कोटी लोकांचे रोजगार बुडाले. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे फार मोठे आव्हान यापुढे असणार आहे. म्हणूनच जागतिक परिस्थितीचा लाभ उठवत विकासदराचे रुतलेले चाक बाहेर काढून नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आपण वाटचाल करू शकू असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाटतो. भीषण दुष्काळ, महापूर, भूकंप, साथीचे रोग यासारख्या कित्येक नैसर्गिक आपत्ती यापूर्वीही आल्या होत्या. परंतु इतिहास असे सांगतो की, या सर्व महाभयंकर संकटातूनही आपण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच जन्माला आलेला विषय म्हणजे जम्मू काश्मीर प्रश्न. सत्तेत असणाऱया तत्कालीन प्रत्येक सरकारने त्याची तड लावण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या जटिल प्रश्नावर सर्वमान्य तोडगा कधीच निघू शकला नाही. काश्मीर प्रश्नातूनच 370 कलमाची बेडी जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या पायात अडकवली गेली होती. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हे कलम रद्द करून जम्मू काश्मीरला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणले गेले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती आणि 370वे कलम रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच हे निर्णय झाले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाचे काय पडसाद उमटतील त्याची शाश्वती नव्हती. काश्मीरमधील फुटीरतावादी शक्ती डोके वर काढून भारताच्या एकात्मता, अखंडत्व आणि सार्वभौमत्वाला आव्हान देऊन भारताची दोन शकले करतील. स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला जोर येईल. जम्मू काश्मीर भारतापासून वेगळा होईल. दहशतवादी कारवाया जोर पकडतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु सुदैवाने गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. विकास आणि गुंतवणुकीचे वारे तेथे वाहू लागले आहे. रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न सुटत आहेत. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून पाकिस्तानच्या आयएसआयचा जम्मू-काश्मीरमधील हस्तक्षेपही कमी झाला आहे. दहशतवादी घटना आणि सुरक्षारक्षकांच्या हत्येमध्ये कमालीची घट झाली आहे. जम्मू-काश्मीरचा वर्षभराचा हा वृत्तांत पाहिला तर स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व खऱया लोकशाहीचे सुचिन्ह मानावे लागेल. शेकडो वर्षे रेंगाळत पडलेला अयोध्या राममंदिराचा प्रश्न हा देखील एक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वाद होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तो संपुष्टात आला. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदराच राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. स्वतंत्र भारताच्या न्यायव्यवस्थेची स्वायत्तता अधोरेखित करणारा व सर्व धार्मिक पक्षांना समाधान देणारा हा निकाल होता. अंधारलेल्या क्षितिजावर या रूपाने नव्या दिशेला आशेचे नवे किरण दिसतात, जे या देशाला नवीन चेहरा देतील. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Previous Articleआजचा आगळा वेगळा 15 ऑगस्ट
Next Article गावठी दारू थोपविण्यासाठी संयुक्त कारवाई करा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.