प्रतिनिधी / मडगाव :
देशातील ‘पुर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला पाहिजेत’ व नव्या शैक्षणिक धोरणात तशी सुचना करण्यात आलेली आहे अशी माहिती शिक्षण तज्ञ तथा नव्या शैक्षणिक धोरण समितीच्या पदाधिकारी डॉ. वसुधा कामत यांनी काल गोमंतत विद्या निकेतन आयोजित ‘विचार वेध’ व्याख्यान मालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 : भारतीय शिक्षण व्यवस्था रूपांतरण करण्याचा एक प्रयत्न’ या विषयांवर बोलताना दिली.
डॉ. कस्तुरीरंगन हे नव्या शैक्षणिक धोरण समितीचे चेअरमन आहेत. नवे शैक्षणिक धोरण राबविणे तसे सहज शक्य होणारी गोष्ट नाही आहे. ते फार कठीण काम आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी किमान 350 ते 400 अत्यंत प्रामाणिपणे योगदान देणाऱया लोकांची गरज भासणार असल्याचे मत खुद्द डॉ. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न असाच त्याचा उल्लेख करावा लागणार असल्याचे डॉ. वसुधा कामत या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या.
उच्च दर्जाचे शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी दूरदृष्टीकोन असला पाहिजे. आम्ही पारंपारिक शिक्षण पद्धतीवर भर दिलेला आहे. पण, आज त्यात बदल होणे काळाची गरज बनली आहे. आम्ही चौथ्या औद्योगिक क्रांतीत आहोत अशा वेळी वेगवेगळय़ा शैलीचा अभ्यास आपल्याला अवगत असला पाहिजे. केवळ नोकरीसाठीच नाही तर माणसांच्या वैयक्तिक विकासाठी शैक्षणिक पद्धतीत बदल व्हायला पाहिजे.
प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे, त्यात निःपक्षपातीपणा असावा, दर्जात्मक व परवडणारी शिक्षण सुविधा असावी व त्याची जबाबदारी सर्व भागधारकांवर असली पाहिजे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, व्यवसायिक शिक्षण, व्होकेशनल एज्युकेशन तसेच इतर विभाग अशी नव्या शैक्षणिक धोरणाची रचना करण्यात आलेली आहे. आज मुले सहा वर्षाची झाली की, त्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. पण, तीन वर्षाच्या मुलाला शाळेच्या आवारात येऊ देत. सद्या ही मुले अंगणवाडीत जातात, पण अंगणवाडी व शाळेचा काही संबंध नसतो. अंगणवाडीचे शिक्षक आहेत ते प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे अंगणवाडी संदर्भात खुप महत्वाचा बदल करण्याची सुचना नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आलेली आहे. तीन ते सहा वर्षाची मुले शाळेच्या जवळपास, किंवा शाळेच्या आवारात पुर्व प्राथमिक शाळा असावी.
आज पर्यंत पुर्व प्राथमिक शाळेकडे कुणीच गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आज अनेकांनी आपल्या घरात किंवा एखाद्या जागेत अंगणवाडी किंवा पुर्व प्राथमिक शाळा सुरू केलेल्या आहेत. पण, त्याचा ताबा सरकारने घेतलेला नाही. महिला व बाल विकास यंत्रणा हय़ा अंगणवाडय़ा चालवितात व 4 कोटी मुलांची गरज पुर्ण करतात. पण, जन्म ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची संख्या ही 24 कोटी मुले आहेत. त्यामुळे आजही 20 कोटी मुले पुर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. ही खुप मोठी समस्या आहेत. ही समस्या निकालात काढण्याची गरज आहे.
बालपणीच मुले अनेक गोष्टी शिकतात, त्यामुळे पुर्व प्राथमिक शाळांवर अधिक भर द्यायला पाहिजे. या ठिकाणी शिकविणाऱयां शिक्षकांना देखील प्रशिक्षण मिळायला पाहिजे. आज ज्या अंगणवाडी शिक्षिका आहेत, त्या मुलांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतात यात शंका नाही. पण, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत त्या कमी पडतात, त्यांना प्रशिक्षण मिळायला हवे अशा सुचना नव्या शैक्षणिक धोरण्यात करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती डॉ. कामत यांनी दिली.