प्रतिनिधी /बेंगळूर
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पर्यावरण शिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. हे शिक्षण धोरण यंदापासूनच जारी केले जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. पुनर्निर्मितीक्षम उर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. सौर विद्युत उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त बेंगळूरमधील भाजप कार्यालय आवारात सीडबॉल तयार करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मरणार्थ 11 लाख रोपांची लागवड करण्याचा उपक्रम भाजपतर्फे हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सीडबॉल तयार करत असून त्याचा वापर करून रोप लागवडीचे नियोजन करण्यात येईल. ज्या ठिकाणी रोपांची लागवड होईल तेथील स्थानिकांच्या मदतीने देखभाल करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात विस्तार होत आहे. त्याच्या तुलनेने हिरवे क्षेत्रही वाढविण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.