सकाळच्या वेळी सोसायटीतून बाहेर पडलं आणि डावीकडे वळून शंभर पावलं चालत गेलं की फुटपाथवर भाजीविक्रेते बसलेले दिसतात.
अशीच एक सकाळची वेळ होती. नंदिनीला-नाग्याच्या बायकोला नाष्टय़ासाठी पोहे करायचे होते. घरात पोहे, तेल, मीठ, मोहरी, मिरच्या, शेंगदाणे… सर्व काही होतं. सरकारने निर्यातबंदीचा अनाकलनीय घोळ घातला त्या सुमारास आणलेले दोन किलो कांदे पुरवून पुरवून वापरल्यामुळे अद्याप संपले नव्हते. गॅस शिल्लक होता. लायटर देखील शाबूत होता. फक्त कोथिंबीर संपली होती.
नंदिनीने पोहे भिजवले. कांदे चिरायला घेतले आणि नवऱयाला विनंती केली, “मी पोहे करतेय, कोथिंबीर आणता का?’’
“आणतंय की,’’ पुटपुटत नाग्यानं कपडे चढवले. आरशात बघून तोंडावर मास्क बांधला.
नंदिनीने कांदे चिरले. मिरच्या चिरल्या. शेगडीवर कढई ठेवली. गॅस प्रज्वलित केला. मग नियत प्रक्रियेनुसार तेल, मोहरी, हळद, कांदे, मिरच्या, शेंगदाणे, पोहे, मीठ वगैरे टाकून कांदेपोहे नामक पदार्थ तयार केला. त्यावर ओलं खोबरं भुरभुरलं. कढईवर काही क्षण झाकण ठेवलं. मग दोन प्लेट्समध्ये पोहे काढून घेतले. कोणत्याही क्षणी नाग्या येईल. पण नाग्या आला नाही. पोहे गार होऊ लागले.
“कुठं गेले? कोणाशी तरी बोलत उभे असतील?’’ करवादत नंदिनीने किचनमध्येच बसून स्वतःची प्लेट संपवली. नाग्याची प्लेट पुन्हा कढईत टाकून झाकून ठेवली. नाग्या येईल. पण नाग्या आला नाही. नंदिनीने त्याला फोन लावला. पण नाग्याने फोन घरीच ठेवला होता. कुठे गेलाय हा बाबा? नाग्या तब्बल तासाभराने आला.
“कुठं गेला होतात? भेटली असेल कोणी तरी ऑफिसातली सटवी?’’
“नाय गं, मी सोसायटीतून बाहेर पडलं. मग एक आठवण झालं. म्हणून आधी उजवीकडे वळलंय. मग चौकातून पुन्हा उजवीकडं. मग एका बोळातून मेन रोडला आणि तिथून चौकात जाऊन कोथिंबीर घेतलं आणि त्याच वाटेनं आलं. म्हणून उशीर झालं.’’
“पण इतक्मया लांबून का?’’
“जवळच्या रस्त्यानं गेलं तर वाटेत आपलं बँक लागतंय. बँकेसमोरून गेलं आणि उद्या बँकेनं नवीन नियम काढून बँकेच्या समोरून गेल्याबद्दल पूर्वलक्ष्यी प्रभावानं आपल्या खात्यातून पैसे कापून घेतलं तर? उगीच रिस्क नको. म्हणून मी लांबून गेलं आणि लांबून आलं.’’
नाग्याचा खुलासा ऐकून नंदिनीनं कपाळावर हात मारून घेतला.