प्रतिनिधी/ फोंडा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्यासाठी रविवारी फोंडा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. फोंडा तालुक्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटना तसेच भाजपा नेते व कार्यकर्ते मोठय़ासंख्येने या रॅलीत सहभागी झाली होते. राजीव गांधी कला मंदिरपासून सुरु झालेल्या या रॅलीची जुन्या बसस्थानकावर सांगता झाली. जुन्या बसस्थानकावर झालेल्या जाहीर सभेत प्रा. दत्ता नाईक यांनी नागरिकत्व कायदा या विषयावर संबोधित करताना राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या मुद्दय़ावर एकसंघ होण्याचे आवाहन केले.
तिरंगा व नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारे फलक हाती घेऊन देशाची एकता व नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाऱया जोरदार घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. भारत माता तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर, भाजपाचे पदाधिकारी सुनिल देसाई, प्रदीप शेट, संदीप खांडेपारकर, मनोहर आडपईकर, संजीव देसाई, यांच्यासह नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर, सरचिटणिस पुरुषोत्तम नाईक, संतोषी शिवपुरी, शिरोडा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक तसेच तालुक्यातील भाजपा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शुभम नार्वेकर, भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या व अन्य नागरिक मोठय़ासंख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱया विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. शांततेत पण नागरिकत्व कायद्याचे जोरदार समर्थन करीत ही रॅली काढण्यात आली.
देशविरोधी कारवाया विरोधात एकसंघ व्हा : प्रा. दत्ता नाईक
देशाच्या उत्तर पूर्व भागातून पाकिस्तान व बांगलादेशमार्गे होणारी घुसखोरी व देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी नागरिकत्व कायदा आवश्यक आहे. शिवाय पाकिस्तानसह अफगाणिस्तान, बांगलादेश व इतर शेजारील राष्ट्रातून देशात शरणार्थी म्हणून येणाऱया अल्पसंख्याक नागरिकांना या कायद्यामुळे सुरक्षा व आश्रय मिळणार आहे. भारतीय मुस्लीम बांधवांना तसेच इतर धर्मातील नागरिकांना त्यापासून कोणताच धोका नाही. केवळ मोदी सरकारला विरोध करण्यासाठी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांकडून मुस्लीम बांधवांमध्ये अफवा पसरवून हिंसाचारासाठी चिथावणी दिली जाते आहे. देशात हिंसाचाराचे वणवे पेटवून जी धार्मिक दुफळी माजवली जात आहे, ती निषेधार्ह आहे. मुळात नागरिकत्व कायदा काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच विचाराधीन होता. आज काँग्रेसकडूनच त्याला विरोध होणे हे दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांचे देशहितासाठी विरोधी पक्षात असूनही भाजपाने समर्थन केले आहे. इतिहास या गोष्टींना साक्ष आहे. निर्वासितांना स्वातंत्र्यपूर्वी काळापासून भारतात आश्रय दिला गेला आहे. त्यासाठी पंडित नेहरु व लियाकत अली करारही झालेला होता. आज इस्लामिक राष्ट्रांमध्ये भारताला आदराचे स्थान मिळू लागल्याने काही हितशत्रू राष्ट्रांकडून भारतविरोधात हेतुपुस्सर जगभर नकारात्मक प्रचार सुरु आहे. हा विरोध म्हणजे त्याचाच भाग आहे. अशा देशविरोधी कृत्यांना चोख उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रप्रेमी नागरिकांनी जागृत व एकसंघ होण्याचे आवाहन प्रा. दत्ता नाईक यांनी केले.
रॅलीचे समन्वयक ऍड. रघुवीर वर्दे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात भारतीय मुस्लीम बांधवांची नागरिकत्व विषयावर दिशाभूल केली जात असल्याचे सांगून मुस्लीम बांधवांनी या कायद्याचा अभ्यास करून तो समजून घ्यावा, असे आवाहन केले. केंद्र सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कुठल्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही. 31 डिसें. 2014 किंवा त्यापूर्वी भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या शेजारच्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांना नागरिकत्व मिळणार आहे, असे स्पष्ट केले.