गांजे रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा : व्हीआयपीसाठी भर पावसात रस्ता, जनतेसाठी कधी?,गांजेवासियांचे पाण्याविना हाल, खड्ढेमय रस्त्यामुळे बेहाल
वार्ताहर /उसगांव
‘सरकार तुमच्या दारी’ घोषवाक्य घेऊन डॉ. प्रमोद सावंत सरकार ग्रामिण भागातून सद्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची नांदी घालत आहे. नाणूस-गांजे मार्गावर मागील कित्येक महिने मात्र रस्त्यावरील खड्डयाचा आकार वाढत आहे. गांजे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाणूसöउसगांव-गांजे-गुळेली रस्ता वाहतूकीसाठी मृत्यूचा सापळा बनतानाही सरकारी यंत्रणा मात्र कोणतेच सोयरसुतक नसल्याचे पवित्रा घेत निद्रीत अवस्थेत कारभार हाकत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.
गांजे रस्त्यावरून जलसंवर्धन खात्यातर्फे गांजे पाणी प्रकल्प ते तिस्क केळीनीपर्यंत पाणी सोडण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हा रस्ता अरुंद व त्यातच एका बाजूने खोदल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्यावर राहिलेला मातीचा भराव बाजूला हटविणे गरजेचे होते. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण न केल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन अपघाताचे सत्र सद्या सुरू आहेत. मृत्यूचा सापळा बनत चाललेला गांजे ते उसगांवपर्यंतचा धोकादायक रस्ता एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होईपर्यंत वाट बघणे सरकारने सोडून द्यावे त्वरीत रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून केली आहे.
खराब रस्त्यामुळे दुचाकीऐवजी प्रवाशी बस प्रवास तोही बेबरवशाचा
नाणूस-उसगांव ते गांजेपर्यंत रस्त्याची पुर्णता चाळण झालेली आहे. खोतोडे, गुळेली, धामशे, गांजे येथील अनेक युवक कामानिमित्त फोंडा, उसगांव भागात येत असतात. त्यांच्यासाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. दुचाकीवरून कामानिमित्त फेंडयाकडे येणाऱया नागरिकांना जीव मुठीत घेऊन चिखलमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. काही महिलांनी कंटाळून दुचाकीप्रवासाऐवजी प्रवासी बसची वाट धरली खरी मात्र मोजक्याच प्रवासी व कदंब बसेस या मार्गावरून येत असल्यामुळे तोही प्रवास बेबरवशांचा ठरत आहे. पावसाळय़ात गांजे येथील खड्डेमय बनलेल्या रस्त्यावरून येण्याची दुचाकी चारचाकीसह सर्व वाहनांनी धास्ती घेतलेली आहे.
व्हीआयपीसाठी भरपावसात हॉटमिक्स रस्ता, जनतेसाठी दारी खड्डे
येत्या 14 ऑक्टो रोजी गृहमंत्री अमित शहा गोवा भेटीवर येत असल्यामुळे सद्या फोंडयातील काही अंतर्गत रस्त्याची डागडुजी भर पावसात होताना दिसते. मात्र गेले कित्येक महिने खड्डेमय बनलेल्या गांजे-उसगांव रस्त्याच्या दलनीय परिस्थितीबाबत कोणतीच उपाययोजना नाही. सरकारच्या संबंधित खात्याने त्वरित याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. वाळपई मतदार संघ हा ‘हायटेक मंत्री’ म्हणून ओळखले जाणारे आरोग्यमंत्री विश्चजीत राणे यांचा मतदारसंघ. मात्र त्याचा मुक्काम सत्तरीपेक्षा पणजीत शहरात जास्त असतो. सद्या सरकारी नोकरीच्या जाहीराती बेसुमार असून एखाद्या सरकारी हुद्दावर आपली वर्णीही लागावी म्हणून बेरोजगार युवकांनी आपली या ज्वलंत समस्येवर तोंड बंद ठेवणे पसंत केले आहे. मात्र यासाठी सद्या पुढाकार घेतला असून गांजे भागातील महिलावर्गामध्ये मात्र प्रचंड संतापाची लाट आहे.
महापुरात पाण्याने वेढलेल्या गांजे भागात पाणीबाणी
ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे गांजे गाव पाण्याखाली गेला होता. याच भागात जलस्रोत खात्याचा बंधारा आहे. तरीही त्या गावातील नागरिकांना कायम पाण्याची समस्येने ग्रासलेले आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही त्यातच राज्य सरकार नेहमी स्वयंरोजगार व शेती बागायतीकडे वळण्याकडे प्रोत्साहन देते. त्यानुसार काही युवक शेती बागायतीकडे वळलेही परंतू त्यांना बागायतीसाठी पाण्याचे नियोजन सराकारी खात्याने केले नसल्याने बागायतीही ओस पडू लागल्या आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, बागायतीलाही पाणी नसल्याने या भागातील लोकांची ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी परिस्थिती झालेली आहे. गंभीर बनत चाललेल्या या प्रश्नावर येत्या दिवसात तोडगा न काढल्यास गांजे व इतर भागातील नागरिक रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.