वार्ताहर/ राजापूर
प्राथमिक आरोग्य केंदांमधील नादुरूस्त रूग्णवाहीका, भरमसाठ येणारी वीजबिले आणि तालुक्यातील खड्डेमय रस्ते, या विषयांवर मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जोरदार चर्चा झाली. रूग्णांना गरजेच्यावेळी रूग्णवाहीका उपलब्ध होत नसतील, तर त्या काय कामाच्या असा सवाल उपस्थित करत एकतर तातडीने रूग्णवाहीका दुरूस्त करा, अथवा पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी सदस्यांनी केली.
राजापूर पंचायत समितीची आढावा बैठक नवनिर्वाचित सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सागर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल आदी उपस्थित होते.
जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका गेल्या काही महिन्यांपासून नादुरूस्त आहे. सदर रूग्णवाहिका दुरूस्त करण्याची मागणी सातत्याने होत असताना अद्यापही तिची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यातच, त्या रूग्णवाहिकेला पर्यायी गाडीची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. रूग्णाला गरजेच्यावेळी रूग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर, उपयोगाची काय? असा सवाल बाजीराव विश्वासराव यांनी उपस्थित केला.
सद्यस्थितीत तालुक्यातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने दुरावस्था झाली आहे. हे खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी अभिजीत तेली, विशाखा लाड, प्रकाश गुरव आदी सदस्यांनी केली. वारंवार मागणी करूनही गंजलेले वीजखांब अद्यापही बदलण्यात आलेले नाहीत. त्याला मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल प्रतिक मटकर, श्री.तेली, उन्नती वाघरे आदींनी उपस्थित केला. भरमसाठ वीजबिलाने सर्वसामान्य ग्राहक बेजार झाले असून ही बिले तातडीने कमी करावीत अशी मागणी श्री.मटकर यांनी केली.
शिक्षण विभागाच्या आढाव्याच्यावेळी दिव्यांग कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांनी माहिती दिली. तर, ग्रामपंचायत फंडातून शाळांची वीजबिले तातडीने भरावीत अशी सूचना सदस्यांनी केली. कृषी विभागाच्या आढाव्याच्यावेळी शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱर्यांपर्यत पोहचणे अपेक्षित असताना मात्र, त्या योजना पुढाऱयांपर्यंत पोहचत असल्याचा आरोप माजी सभापती अभिजीत तेली यांनी केला.
भात पीक विम्याविषयी शेतकऱयांना योग्यवेळी माहिती दिली गेली असती तर, तालुक्यातील मोठय़ासंख्येने शेतकऱयांना भातशेतीची नुकसानभरपाई मिळाली असती. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेचा त्यांना नाहक फटका बसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीला पंचायत समितीच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.