मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांनी पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावे, असं नवाब मलिक म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवाब मलिक म्हणाले की, नाना पटोले यांनी जे आरोप केलेत ते त्यांनी माहितीच्या अभावानं केले आहेत. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीनं माहिती गृहखातं संकलित करत असतं. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत असल्याचे म्हणत नवाब मलिक यांनी नान पटोले यांच्यावर आरोप केला.
नाना पटोलेंना वाटत असेल त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसं सांगावं, तसं पत्र गृहविभागाला द्यावं, असंही मलिक म्हणाले.
नाना पटोले काय म्हणाले होते ?
नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला आहे.