मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत असून त्यांनी मातोश्रीच्या अंगणातूनच जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी नारायण राणे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेत राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही, अशी चर्चा उभ्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र मुंबईतलं पहिलं भाषण आवरुन राणे थेट शिवाजी पार्कवर गेले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
यावेळी राणेंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी तिथपासूनच नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.