मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मिनी लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी राज्यात लॉकडाउन लावण्यास विरोध दर्शवला आहे. याच संदर्भात नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाउनवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात कोरोना वाढतोय, त्यामुळे पुन्हा लॉकडाउन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाउन करायला एवढे उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घोषणा दिली. पण माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पार पाडायला ते कमी पडले, कारण त्यांच्या घरातील पत्नी, मुलं सगळेच कोरोनाग्रस्त झाले. माझी जबाबदारी त्यांना पेलवलेली नाही. मुख्यमंत्र्यांचं धोरण चुकीचं असल्यानेच राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला.
रोग्याच्या बाबतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत काय यंत्रणा आहे. वर्षभरात तुम्ही 18 हजार बेड्स उपलब्ध करून शकला नाहीत. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढतेय. आता व्यापारी आणि जनतेनं लॉकडाउनला विरोध केलेला आहे. एकतर वर्षभर व्यापाऱ्यांना धंदा नाही. त्यामुळे हे सरकार आता घाबरलं आहे. शिस्त पाळा नाही तर आम्ही लॉकडाउन करू, आता ते अशी धमकी देत आहेत. लोकांना मानसन्मान देऊन त्यांनी बोलायला हवं. आता दिवसा नाही रात्री लॉकडाउन करणार आहेत. माणसं दिवसभरातून काम करून संध्याकाळी घरी जातात. मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा, मग जेवायची सोय काय आपली?, तुम्ही जेवायची व्यवस्था सगळी येते. कोरोनामुळे सरकारनं नाक कापलंच, पण महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत मागे गेले. मुख्यमंत्री आणि या सरकारमुळे राज्य अधोगतीकडे गेलेय. लॉकडाउन राज्याला आता पेलवणारं नाही. सगळे उद्योगपती आज कोलमडलेत, याची चिंता यांना आहे की नाही?, असा प्रश्न देखील नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.