आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वाटप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच अन्य क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. विविध क्षेत्रांमध्ये अनुकरणीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱया 29 महिलांना यदा हा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील शोभा गस्ती यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कर्नाटकातील निवृत्ती राय (इंटेल इंडिया प्रमुख), शोभा गस्ती (समाजसेविका) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सायली अगवाने (डाउन सिंड्रोमने पीडित कथ्थक नृत्यांगना), वनिता बोराडे (सर्पमित्र), कमल कुंभार (सामाजिक उद्योजिका) यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शोभा गस्ती यांनी महिला विकास आणि संरक्षण संस्था सुरू केली होती. या संस्थेच्या माध्यमातून बेळगावमधील 3 तालुक्यांमधील 360 गावांमध्ये कार्य केले आहे. 3600 हून अधिक देवदासींना मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी कामगिरी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केली आहे. बालविवाह रोखत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी जनजागृती केली आहे. बालतस्करी आणि बालशोषण रोखण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
अनिता गुप्ता
राष्ट्रपती कोविंद यांनी ग्रामीण आणि वंचित महिलांना सशक्त करण्यासाठी दिलेल्या योगदानाकरता अनिता गुप्ता यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. अनिता गुप्ता या बिहारच्या भोजपूर येथील सामाजिक उद्योजिका असून त्यांनी 50 हजारांहुन अधिक ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देत अनेक प्रकारच्या कार्यांमध्ये कौशल्य प्राप्त करून दिले आहे.
आरती राणा
राष्ट्रपतींनी आरती राणा यांना हा पुरस्कार प्रदान केल आहे. उत्तरप्रदेशच्या खीरी येथील आरती या विणकर तसेच शिक्षिका आहेत. त्यांनी 800 हून अधिक थारु महिलांना शिल्पकलेचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच 150 महिला स्वयंसहाय्य गटांची स्थापना केली आहे. यामुळे आदिवासी विणकर महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
डॉ. इला लोध
राष्ट्रपती कोविंद यांनी महिलांचे आरोग्य तसेच वंचित समाजासाठी केलेल्या योगदानासाठी डॉ. इला लोध (मरणोत्तर) यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. इला लोध यांनी याचबरोबर त्रिपुरामध्ये हेपेटायटिस फौंडेशनची स्थापना केली होती.
जया मुथु अन् तेजम्मा
राष्ट्रपती कोविंद यांनी जया मुथु आणि तेजम्मा यांनाही पुरस्काराने गौरविले आहे. या दोन्ही महिलांनी तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये शतकांपासूनची टोडा हस्तकला संरक्षित करणे आणि त्याला चालना देण्याचे महत्त्वाची कामगिरी केली आहे.
जोधैया बाई बैगा
आदिवासी बैगा कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी जोधैया बाई बैगा यांना राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. आदिवासी संस्कृतींना कॅनव्हासवर चित्रित करत जोधैया बाई बैगा यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर इटली आणि फ्रान्समध्ये प्रदर्शित झाले आहे.
मीरा ठाकूर
अद्वितीय सिक्की घास कलेला प्रोत्साहन देणे आणि पंजाबमध्ये वंचित महिलांना सशक्त करण्याचे कार्य केल्याप्रकरणी मीरा ठाकूर यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सिक्की ग्रास आर्टचे मीरा ठाकूर या मोफत प्रशिक्षण देतात आणि आतापर्यंत त्यांनी 400 हून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.
वनिता बोराडे
50 हजारांहून अधिक सापांना वाचविणाऱया वनिता बोराडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सापांना वाचविण्यासह त्या त्यांच्या संरक्षणासाठी जागरुकता मोहीम देखील चालवितात. वनिता या महाराष्ट्राती बुलढाणा जिल्हय़ाच्या रहिवासी आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविले होते.