प्रतिनिधी /बेळगाव
आनंदनगर क्रॉस क्रमांक 3 परिसरात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशातच येथील नाल्याचे पाणी विहिरींमध्ये पाझरून विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, तसेच नाल्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
आनंदनगर परिसरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जात नसल्याने पाणी समस्येची झळ आनंदनगरमधील रहिवाशांनादेखील बसली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश रहिवाशांच्या अंगणात विहिरी व कूपनलिका आहेत. पण परिसरामधून वाहणाऱया नाल्याचे पाणी विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाझरत आहे. नाल्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण नाल्याच्या सर्वेक्षणाच्या मुद्यावरून नाल्याचे बांधकाम रखडले आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मुख्यतः पाण्याची समस्या भेडसावत आहे. नळाला पाणीपुरवठा झाला नसल्याने विहिरी व कूपनलिकाच्या पाण्याचा वापर केला जातो. पण विहिरी आणि कूपनलिकाचे पाणी दूषित झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह नाल्याचे बांधकाम करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.