राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ : शस्त्रे ‘म्यान’ केल्याची राजकीय पातळीवर चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय पातळीवर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला सत्तेची आवड नाही. तसेच आपण सत्तेसाठी भुकेले नसून त्यात रसही नसल्याची कबुली राहुल गांधींनी स्वतः दिली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत भाष्य करताना पक्षाच्या खराब कामगिरीचा सर्व दोष त्यांनी मायावतींवर टाकला.
दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन समारंभात त्यांनी केलेल्या विधानाचा वेगवेगळय़ा पातळीवर अर्थ काढला जाऊ लागला आहे. एकीकडे काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा सुरू असताना ज्या राहुल गांधींना पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपला ‘अर्जुन’ मानतात, त्याच व्यक्तीने आपल्याला सत्तेत काही रस नसल्याचे वक्तव्य केल्याने त्यांनी शस्त्रे म्यान केलीत काय? असा प्रश्न टीव्ही चॅनेल्सवरील चर्चांमध्ये उपस्थित केला जात आहे. राहुल यांच्या ‘सत्तेत रस नाही’ या विधानामुळे त्यांना राजकारणात रस नाही असा संदेश प्रसारमाध्यमांमध्ये गेला.
राहुल गांधी यांनी शनिवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आणि काँग्रेस नेते के. राजू यांच्या ‘दलित ट्रुथ ः द बॅटल्स फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स व्हिजन’ या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सत्ता, सत्तासंघर्ष ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका, मायावती आणि आरएसएस या सर्व गोष्टींवर भाष्य करत प्रत्येक मुद्यावर आपली मते मांडली.
उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला दोन तर बसपाला केवळ एक जागा मिळाली. 2014 पासून काँग्रेसची घसरण सुरू आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. अशा स्थितीत सत्तेत रस नाही, असे त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचणारे दिसते. शेवटी कोणत्याही पक्षाचे ध्येय सत्तेवर येणे हेच असते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
देशाने मला प्रेमही दिले, जोडेही मारले!
देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर जोडेही मारले आहेत, असेही राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. देशातील जनतेने मला किती मारहाण केली हे तुम्हाला समजू शकत नाही. यावर मी विचार केला की असे का होत आहे? आणि देशाला मला शिकवायचे आहे, याचे उत्तर मिळाले. ‘शिका, समजून घ्या’ असा संदेश आपल्याला यातून देश देत असल्याचेही ते पुढे म्हणाले.
मायावतींना युतीचा संदेश पाठवला, पण…
मायावतींनी यावेळी निवडणूक प्रभावीपणे लढवली नसल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही मायावतींना युती करा आणि मुख्यमंत्री व्हा असा संदेश दिला होता. पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने युतीचा मुद्दा पुढे चर्चेतच आला नसल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.