प्रतिनिधी/ निपाणी
केंद्रातील भाजप सरकारने नागरिकत्वाचा कायदा आणून देशवासीयांनी रक्त सांडून मिळवलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला सर्वधर्मियांनी एकजुटीने तोंड देऊन हा कायदा रद्द होईपर्यंत लढा द्यावा, असे आवाहन निपाणीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी निपाणीतील नेहरु चौकात काँग्रेस पक्ष, निधर्मी जनता दल, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच विविध अल्पसंख्यांक, दलित व समविचारी संघटनांच्यावतीने निषेध सभा झाली. यावेळी मोठय़ा संख्येने जमलेल्या नागरिकांनी एनसीआर व सीएए या कायद्यांचा निषेध केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काका पाटील होते. स्वागत माजी सभापती किरण कोकरे तर प्रास्ताविक नगरसेवक प्रा. जसराज गिरी यांनी केले. यावेळी बोलताना काका पाटील म्हणाले, संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला एकजुटीने विरोध होत आहे. भाजपविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांशी राष्ट्रीय नेत्यांनी विरोध केला आहे. या कायद्यामुळे स्वातंत्र्य हिरावण्याची भीती असून याविरोधात एकजुटीने सर्वांनी लढा द्यावा, असे आवाहन केले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सर्वधर्मियांची काळजी घेणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने आणलेले हे फुट पाडणारे काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी रस्त्यावर येऊन विरोध करणे गरजेचे असल्याचे सांगितले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, काँग्रेस सरकारने कुळकायदा, बँकांचे राष्ट्रीयीकरण, अन्नसुरक्षा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा असे कायदे आणून त्याचा देशातील सर्वच जनतेला लाभ होईल, असे प्रयत्न केले. मात्र केंद्रातील जातीवादी भाजप सरकारने सत्तेच्या धुंदीत जातीजातीत फुट पाडणारे कायदे आणले असून आपल्या हक्कांसाठी नागरिकांनी लढा द्यावा, असे आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, घटनेने दिलेल्या लोकशाहीमुळे सत्तेत आलेल्या भाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका केली. माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांनी, नोटाबंदीनंतर आता नागरिकत्वाच्या कायद्यामुळे लोकांना पुन्हा रांगेत उभे रहावे लागणार आहे. मुस्लीमांबरोबर 30 ते 35 टक्के गोरगरिब हिंदूंनाही हा कायदा त्रासदायक ठरणार असल्याचे सांगितले. आरपीआयचे ऍड. अविनाश कट्टी यांनी, आजही अशिक्षितांकडे कागदपत्रे नाहीत. मात्र आमच्या शंभर पिढय़ा देशात जन्माला येऊनही आम्ही भारताचे नागरिक आहोत हे सांगणे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले.
यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. सी. ए. खराडे, मोहन बुडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल संकपाळ, निधर्मी जनता दलाचे निपाणी अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, परवीन नायकवडी, माजी ता. पं. अध्यक्षा शहिदा मुजावर, हालशुगरचे संचालक सुकुमार पाटील, अनिस मुल्ला, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. ए. क्यू. एन. बागवान आदींनी मनोगते व्यक्त केली.
सभेस निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रदीप जाधव, माजी नगराध्यक्षा सुनीता होनकांबळे, नम्रता कमते, पुष्पाताई कुंभार, दत्त शिरोळ साखर कारखान्याचे संचालक श्रेणिक पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, संजय पावले, शेरु बडेघर, दत्तात्रय नाईक, शांता सावंत, अनिता पठाडे, संतोष माने, शरीफ बेपारी यांच्यासह नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले. तर दीपक ढणाल यांनी आभार मानले.