वार्ताहर/ निपाणी
दिवसभर ढगाळ वातावरण, हवामानात उष्णता, रात्री थंडी या सर्वातून निपाणीसह परिसरात पहाटेपासून धुके पडू लागले आहे. हे धुके तंबाखू, हरभरा, कांदा आदी पिकांसह फळ व भाजीपाला उत्पादनावर विपरीत परिणाम करते. अधिकतर पिकांवर कडक्या रोगाचा प्रादूर्भाव होतो. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागाने गेल्या सहा महिन्यात दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी अशी एका मागोमाग एक अशी संकटे झेलली. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान होताना आर्थिक फटका सहन केला. ही नुकसान भरपाई शेतकऱयांपर्यंत पोहचण्याची प्रक्रियाही अजून पूर्णही झालेली नाही. तोच धुक्याचे संकट पुढे उभे ठाकल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
सध्या परिसरात तंबाखूची भरणी सुरू आहे. काही क्षेत्रातील तंबाखू कापणीलाही प्रारंभ झाला आहे. अशा परिस्थितीत चांगले उत्पन्न हाती येण्यासाठी थंडी पडणे आवश्यक आहे. यानुसार गेल्या दोन दिवसांपासून थंडी सुरू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत होता. पण थंडीला सुरुवात होताच दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तर पहाटे धुके पडायला सुरुवात होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होताना दर्जा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कांदा भाववाढीने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यातून ग्राहकांच्या डोळय़ात कांदा कापल्यानंतर येणारे पाणी, वाढलेले भाव ऐकूनच येऊ लागले आहे. दरवाढीचा लाभ मिळविण्यासाठी अनेक शेतकऱयांनी कांदा लागवड केली आहे. पण पडणाऱया धुक्यामुळे कांदा उत्पादन धोक्यात आले आहे.