आवक घटल्याने बाजारात तेजी : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
प्रतिनिधी / निपाणी
निपाणी आठवडी बाजारात वांग्याचा दर प्रति किलो 150 रुपये झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईमध्ये सतत वाढ होत असल्याने इतर भाजीपाला तसेच माळव्यांच्या दरातदेखील वाढ होत असल्याने नेमका कोणता भाजीपाला खरेदी करायचा, असा प्रश्न महिलावर्गासमोर पडला आहे. अन्य भाजीपाल्यांचे दरही 100 रुपयांच्या वर गेल्याने आठवडी बाजारात येणाऱया ग्राहकांना थंडीतही घाम फुटल्याचे पहावयास मिळाले.
निपाणीत दर गुरुवारी भरणाऱया आठवडी बाजाराला 25 हून अधिक खेडय़ातून व्यापारी, शेतकरी, नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. या आठवडी बाजारात लाखोंची उलाढाल होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला तसेच इतर शेतीमालाच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱया सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडू लागले आहे. बाजारात वांगी 150 रुपये किलोबरोबरच दोडकी 140 रुपये किलो, भेंडी 100 रुपये किलो, गवार 120, वरणा शेंगा 120, बीट 120, दीडक्याच्या शेंगा 100, तसेच गाजर 50 रुपये, कांदे 30, रताळे 20 रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत होते.
शिवाय मेथीची भाजी 20 रुपये पेंडी, कांदाभाजी 10 रुपये, पोकळा 10 रुपये, पालक 10 रुपये पेंडी याप्रमाणे विकली जात होती. अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस, धुके आदी निसर्गाच्या विविध कारणांमुळे वांग्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दर कडाडले असल्याची माहिती वांगी विक्रेत्या मुत्नाळे यांनी सांगितले.