कोरोना नियंत्रणासाठी मंत्री डॉ. सुधाकर यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
सातत्याने सूचना देऊनसुद्धा कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याचा विचार चालविला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून नियमांचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध कारवाई करण्याचे स्वरुप निश्चित करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
मास्क परिधान न करणे, सामाजिक अंतर न राखणे, सभा-समारंभांमध्ये गर्दी जमविणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी कायदेतज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लॉकडाऊन हटविण्यात आल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कितीही जागृती केली तरी जनतेकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कठोर नियम जारी करणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱयांना कठोर शिक्षा आणि दंडात्मक कारवाई करणे अनिवार्य आहे, असे ते म्हणाले.
अलिकडे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक सभा-समारंभ आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक सुद्धा सावधगिरी न बाळगता अशा ठिकाणी गर्दी करत आहे. परिणामी कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. त्यामुळे अशा सभा-समारंभांवर निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असणाऱया जिल्हाधिकाऱयांशी आपण चर्चा करून निर्णय घेणार आहे. अलिकडेच कायदेतज्ञ आणि अधिकाऱयांनी आपल्याला सल्ले दिले आहेत. याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सुधाकर यांनी सांगितले.
… तरच हे युद्ध जिंकता येणार!
कोरोनाविरुद्धचा आपला लढा अद्याप संपलेला नाही. जनतेने सरकारला सहकार्य केले तरच हे युद्ध जिंकता येणार आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर, युवा वर्ग, संघ-संस्थांनी कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सरकारला सहकार्य करावे. मोफत उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांनी शेजाऱयांशी, निकटवर्तीयांशी संवाद साधून आपले अनुभव सांगावेत. यातून जागृती होऊन भीती दूर होईल, असे आवाहन त्यांनी केले.