मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्ट आदेश : अधिक संसर्ग असणाऱया जिल्हय़ांना केले सतर्क : व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱयांशी संवाद
प्रतिनिधी / मुंबई:
कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही आणि त्यातून सावरून तिसऱया संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. त्यातच ‘डेल्टा प्लस’ या नव्या कोरोना व्हेरीएंटचा राज्यासमोर धोका आहे. जिल्हय़ांसाठी विविध निर्बंधांच्या पातळय़ा ठरवण्यात आल्या असल्या, तरीही स्थानिक प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबत कोणतीही ‘रिस्क’ घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हाधिकाऱयांशी मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही या दूरदृष्य बैठकीला उपस्थिती होती.
शहरी, ग्रामीण भागाचा बारकाईने आढावा घ्या
मुख्यमंत्री म्हणाले, ‘बेक द चेन’अंतर्गत गेल्या दोन आठवडय़ांपासून आपण वेगवेगळय़ा पातळीवर निर्बंध शिथील करीत आणले आहेत. निर्बंधांच्या विविध पातळय़ा ठरवल्या असल्या, तरीही कोणताही धोका न घेता स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. या पातळय़ांचा आधार घेऊन नागरिक नियम न पाळता व्यवहार करणार असतील, गर्दी करणार असतील, तर संसर्ग पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या शहरातील जिल्हय़ातील ग्रामीण भागातील संसर्गाच्या स्थितीचा योग्य अभ्यास करा आणि नंतरच व्यवहार खुले करा. घाईघाईने कोणेतही निर्णय घेतल्यास अंगलट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्याच, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वाढते डेल्टा व्हेरीएंट रुग्ण, धोक्याची घंटा
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा मोठा फटका आपल्याला जाणवला आहे. त्यातून बोध घेण्याची गरज आहे. तसेच दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. शिवाय तिसऱया संभाव्य लाटेचा मुकाबलाही करावा लागणार आहे. डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे राज्यातील वाढते रुग्ण हीसुद्धा धोक्याची घंटा आहे. याची गंभीर दखल घ्यावी, त्याच्या उपचाराची अद्याप ठोस माहिती नाही. तो संसर्ग वाढणार नाही, याची आरोग्य विभागाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
धोक्यात सात जिल्हय़ांनी सतर्क व्हावे!
अशा अनेक बाबींची समस्या आपल्यापुढे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हय़ांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. या जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणांनी पुढील काळाचा अंदाज घेऊन जास्तीचे ऑक्सिजन तसेच आयसीयू बेड्स किती लागू शकतील, फिल्ड रुग्णालय सुविधा किती प्रमाणात लागतील, याचे नियोजन करावे. राज्याच्या टास्क फोर्सबरोबर संवाद ठेवून प्रत्येक घडामोडीसाठी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी अधिक वेगवान कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पावसाळी साथरोगांचेही आव्हान
पावसाळा असल्याने साथरोगांचेही नियंत्रण करावे लागणार आहे. त्यादृष्टीने या जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणेने पर्यायी सक्षम व्यवस्था निर्माण करावी. सर्वजण कोरोना सेवेत गुंतले, तर अन्य साथींचे आजार फोफावण्याची शक्यता आहे. तीही दक्षता घेतली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठीही सक्षम यंत्रणा आत्तापासून तयार ठेवण्याची गरज आहे. दुर्गम व ग्रामीण भागात औषधे व अन्य सुविधा निर्मितीसाठी जागा इमारतींचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.
आवश्यक सुविधा पुरवणार
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, या सात जिल्हय़ांतील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील तीन जिल्हे कोकणातील, तीन पश्चिम महाराष्ट्रातील व एक मराठवाडय़ातील आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात चाचण्या, ट्रेसिंग व लसीकरणावर भर दिला जाईल. या जिल्हय़ांना आवश्यक सुविधा पुरवण्यात येतील. वाडीवस्तीवर कंटेनमेंट झोन करावेत, असेही त्यांनी सांगितले.
टास्कफोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी म्हणाले, या सात जिल्हय़ांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवा. लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे लागेल. प्रसंगी अधिक निर्बंध लावावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या जिल्हय़ांतील परिस्थितीचा तपशील दिला. राज्याचा पॉझिटीव्हीटी रेट 0.15 टक्के कमी झाला आहे. तथापि या सात जिल्हय़ांत दर जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.
रुग्णसंख्या घटत असली, तरी निर्बंधाची कडक अंमलबाजवणी – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
याप्रसंगी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हय़ात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली. तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्हय़ात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या असून कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असून पॉझिटीव्हिटी दरही दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. तरीदेखील जिल्हय़ात कोविडच्या निर्बधाची अधिक कडक अंमलबाजवणी करून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही सांगितले.