पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गरज पडल्यास मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
बेंगळूर येथील आर. आर. नगर, तुमकूर जिह्यातील शिरा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान शांततेत झाले. शिरामध्ये चुरशीचे 84.54 टक्के मतदान झाले आहे. आर.आर.नगरमध्ये मात्र मतदारांचा उत्साह दिसत नाही. केवळ 45.24 टक्के मतदान झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस, निजद यांच्यासाठी प्रति÷sची आहे. या पाठोपाठ आता राजकीय पक्षांचे लक्ष बेळगाव लोकसभा आणि मस्की व बसवकल्याण विधानसभा पोटनिवडणुकीकडे लागले आहे. या तिन्ही निवडणुकीसाठी भाजपने कार्यकारी समितीची बैठकही घेतली आहे. काँग्रेसलाही शिरा व आर.आर.नगर निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. कारण यापूर्वी आर.आर.नगरमध्ये काँग्रेस तर शिरा विधानसभा मतदार संघात निजद उमेदवार विजयी झाले होते. या दोन्ही मतदार संघात काँग्रेसला विजयाची अपेक्षा आहे. किमान शिरा मतदार संघात माजी मंत्री टी. बी. जयचंद्रा हे विजयी होणार अशी अपेक्षा आहे. पोटनिवडणूक निकालानंतर उर्वरित तीन पोटनिवडणुकांच्या तयारीला लागण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
दोन मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होऊन दुसऱयाच दिवशी राज्य सरकारने वीज दरवाढ जाहीर केली आहे. सरकारला हिंमत असती तर मतदानाआधी दरवाढ का जाहीर केली नाही असा प्रश्न विरोधक उपस्थित करू लागले आहेत. राज्यातील सर्व वीज कंपन्यांनी सरासरी 5.4 टक्के याप्रमाणे प्रति युनिटला 40 पैसे दरवाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून ही दरवाढ अमलात आली आहे. विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रतियुनिट 1 रुपये 26 पैसे दर वाढ देण्याची मागणी वीज कंपन्यांनी केली होती. मात्र सरासरी 40 पैसे प्रतियुनिट दरवाढ करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वीज दरवाढीला विरोध केला जात आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. ही व्यवस्था सुधारण्याआधीच सरकारने दरवाढ करायला नको होती अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे. दरवाढ करायचीच होती तर आर.आर.नगर आणि शिरा पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी का केली गेली नाही. मतदानानंतर दुसऱयाच दिवशी दरवाढ का करण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे.
पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली आहे. गरज पडल्यास मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये नेतृत्व बदलाच्या मुद्दय़ावरून कलगीतुरा सुरू झाला आहे. कर्नाटकात पोटनिवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर येडियुराप्पा मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. नवी दिल्ली येथून आपल्याला यासंबंधी माहिती मिळाली आहे, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. आपल्याला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. आपण स्वतः येडियुराप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. नेतृत्व बदलासाठी तेही एक प्रमुख कारण आहे, असे सांगणाऱया सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध येडियुराप्पा पार भडकले आहेत.
सिद्धरामय्या हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलावे. त्या पदाला शोभेल असे त्यांचे वागणे, बोलणे असायला हवे. आपल्यालाही दिल्लीतून माहिती मिळाली आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष नेतेपदावरून सिद्धरामय्या यांना पायउतार क्हावे लागणार आहे. त्यांच्या विरोधी पक्ष नेतेपदालाच सुरूंग लागणार आहे, अशा शब्दात येडियुराप्पा यांनी पलटवार केला आहे. पोटनिवडणूक निकालानंतर कोण कोणाला बदलणार, कुणामुळे कोणाला पायउतार व्हावे लागणार, मंत्रिमंडळ विस्तार होणार का, आर.आर.नगरमधून मुनीरत्न विजयी होणार का? मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार का आदी प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली निवडणूक आहे. आर.आर.नगर व शिरा या दोन्ही मतदारसंघात वक्कलिगा समाजाचे प्रस्थ आहे. या दोन्ही मतदार संघात काँग्रेसने वक्कलिगा उमेदवार दिले आहेत. जातीचे हे समीकरण काँग्रेसच्या पथ्यावर पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शिवकुमार यांना लगाम घालण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी या निवडणुकीत प्रयत्न केल्याचीही माहिती आहे. निकालानंतरच या साऱया प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
कर्नाटकातही लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारवर दबावही वाढत चालला आहे. केवळ लग्नासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात यासाठी कायदे करण्यात येत आहेत. कर्नाटकातही स्वतंत्र कायद्याचा विचार सुरू आहे. स्वतः गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही माहिती दिली आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. अनेक राज्यात फटाके उडविण्यावर बंदी आणण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत फटाक्मयांवर निर्बंध घालण्याची शक्मयता आहे. कारण 6.7 कोटी लोकसंख्या असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत 8,35,773 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बुधवारी रात्रीपर्यंतची सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 1.1 कोटी जणांना कोरोना होऊन गेला असणार अशी धक्कादायक माहिती सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण लोकसंख्येच्या 16 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके आढळून आली आहेत. डिसेंबर आणि मार्चमध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हिवाळय़ात फैलाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी आणि खबरदारी घेणे हा एकच उपाय आहे.
रमेश हिरेमठ