प्रतिनिधी/ रत्नागिरी
एका बाजूला आरोग्य मंत्री, मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवण्याचे पोटतिडकीने आवाहन करत असताना रविवारी शहरातील सावरकर नाटय़गृहात रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाच्या नियोजनाचा अक्षरश: फज्जा उडाला होता. एकाच छताखाली 1 हजाराहून जास्त प्रशिक्षणार्थी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता.
निवडणूक प्रशिक्षणासाठी शासन निर्देशित आसन क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी एकाच छताखाली बोलवण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान निलंबनाची भीती दाखवण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा प्रशिक्षणस्थळी सुरू होती. जिल्हय़ामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदींचा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, मात्र या आयोजनामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचा पुरता फज्जा प्रशासनाकडून उडाल्याचे चित्र रत्नागिरीमध्ये पहावयास मिळाले.
रत्नागिरीमध्ये 3 ते 10 जानेवारी रोजी प्रशिक्षण आहे. 3 रोजी होणारे पहिले प्रशिक्षण दामले विद्यालय व वीर सावरकर नाटय़गृह अशा दोन ठिकाणी दोन गटात आयोजित करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ही दोन्ही प्रशिक्षणे एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाटय़गृहाची क्षमता 950 एवढी आहे. त्यातच शासनाने आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने नाटय़गृह वापराच्या सूचना दिलेल्या असताना प्रत्यक्षात प्रशिक्षणाला 1 हजाराहून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, नेंदणी व प्रशिक्षण देणाऱया व्यक्ती, सेवक, चहापान व्यवस्थेतील व्यक्तींचा समावेश होता. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर नाटय़गृहातील गर्दी पाहून काही मंडळींनी सुरक्षिततेचा भाग म्हणून वेगळे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशिक्षण देणाऱया अधिकाऱयाने त्यांना जबरदस्तीने खुर्च्यांमध्ये बसण्यास भाग पाडले. बाजारात बिनधास्त फिरता मग इथे कशाला घाबरता, असा प्रश्नही विचारण्यात आल्याचे येथील प्रशिक्षणार्थींकडून सांगण्यात आले. प्रशिक्षण संपल्यानंतर बाहेर पडणाऱया बहुतांश शिक्षकांमध्ये याच बाबींची चर्चा जोरदारपणे रंगली होती.
एक थर्मल स्कॅनर अन् हजारो प्रशिक्षणार्थी
या ठिकाणी फक्त प्रवेशद्वाराजवळ एक थर्मल स्कॅनर बसवण्यात आला होता. एक स्कॅनर व हजारो प्रशिक्षणार्थी त्यामुळे आलेले लोक अक्षरश: वैतागले होते. स्वच्छतागृहात साबणही ठेवण्यात आला नव्हता. सहय़ा, कागद हाताळणीच्या ठिकाणीही पुरेशी काळजी घेण्यात न आल्याची माहिती समोर आली. आधी आत जावून सही मग पुन्हा बाहेर येवून थर्मल स्कॅन आणि पुन्हा प्रवेश, अशी व्यवस्था असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रशिक्षण यशस्वीपणे सुरळीत पार
नियोजन सुरळीतपणे पार पडले. कोणतीही बाब अनुचित घडली नाही. चोख व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या कर्मचाऱयांनीही योग्य ते सहकार्य केले. मात्र नाराजी व्यक्त करण्यासारखे काहीही घडले नाही. सकाळी 8.30 वाजल्यापासूनच प्रशिक्षणार्थींना बोलावण्यात आले होते. त्यामुळे प्रशिक्षण यशस्वीपणे सुरळीत पार पडले.