राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
विधानसभा निवडणूक किंवा इतर कोणत्याही निवडणुका या मतपत्रिकेव्दारे घ्याव्यात. बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानंतर सीमाभागामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. धर्मवीर संभाजी चौक येथे त्याचा निषेध करण्यासाठी मराठी भाषिक तरुण उपस्थित होते. मात्र त्यानंतर निष्पाप या तरुणांवरच गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांची त्वरीत सुटका करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाचा अवमान झाला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. ज्यांनी अवमान केला आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र निष्पाप कार्यकर्त्यांनाच यामध्ये गोवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात या सर्व तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. तेंव्हा याचा विचार करावा आणि जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेवून तातडीने सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, राहुल मेत्री, नारायण बसर्गी, श्याम मंतेरो, शिवाजी लाड, विनायक पाटील, रणजीत शिंदे, टी. एस. कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.