वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रीय गुप्तचर ग्रिड (नेटग्रिड)ची लवकरच सुरुवात केली जाण्याची अपेक्षा आहे. याचे लक्ष्य ‘भारताच्या दहशतवादविरोधी क्षमतांना वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रॉनिक डाटाबेसचे अंतिम परीक्षण केले जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेटग्रिडची कल्पना समोर आली होती.
नेटग्रिड लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलिकडेच दिले होते. दहशतवाद्यांसंबंधीच्या माहितीचा सुरक्षित डाटाबेस असावा असा यामागे विचार आहे. कोरोना संकट आले नसते तर पंतप्रधानांनी नेटग्रिड देशाला समर्पित केले असते. पंतप्रधान लवकरच नेटग्रिड देशाला समर्पित करतील अशी अपेक्षा असल्याचे शाह यांनी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 51 व्या स्थापना दिनी बोलताना म्हटले होते.
डाटाच्या मदतीने संशयितांचा शोध लावून दहशतवादी हल्ले रोखणे तसेच बँकिंग, व्यक्तिगत प्राप्तिकर, हवाई आणि रेल्वेप्रवास यासारखी गुप्त माहिती उपलब्ध होईल अशाप्रकारचे तंत्रज्ञान नेटग्रिडच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. 26/11 च्या हल्ल्यांवेळी सुरक्षा यंत्रणांकडे महत्त्वपूर्ण गुप्तचर माहिती पाहण्यासाठी कुठलीच व्यवस्था असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते.
पहिल्या टप्प्याच्या योजनेच्या अंतर्गत 10 वापरकर्त्या यंत्रणा आणि 21 सेवा प्रदात्यांना नेटग्रिडशी जोडले जाणार आहे. तर पुढील टप्प्यांमध्ये सुमारे 950 संघटनांना याच्याशी जोडले जाईल. आगामी वर्षांमध्ये एक हजारांहून अधिक संघटनांना नेटग्रिडशी संलग्न करण्यात येणार आहे. या डाटा स्रोतांमध्ये इमिग्रेशन आणि देशाबाहेर पडण्याशी संबंधित माहिती, बँकेसंबंधी आणि आर्थिक देवाण-घेवाण तसेच फोन रिकॉर्ड सामील असेल.
केंद्रीय यंत्रणांना असणार ऍक्सेस
सीबीआय, महसूल गुप्तचर संचालनालय, अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क बोर्ड, केंद्रीय प्रत्यक्ष कर, कॅबिनेट सचिवालय, इंटेलिजेन्स ब्युरो, जीएसटी गुप्तचर महासंचालनालय, स्वापक नियंत्रण ब्युरो, वित्तीय गुप्तचर शाखा आणि एनआयएला नेटग्रिडचा ऍक्सेस असणार आहे.
26/11 वेळी दिसून आली त्रुटी
अमेरिकेतील संशयित दहशतवादी डेव्हिड हेडलीच्या 2006-2009 या काळातील भारताच्या अनेक दौऱयांदरम्यान त्याच्या प्रवासाचा थांगपत्ता लावण्यात आलेल्या अपयशामागे गुप्तचर आणि कायदा-अंमलबजावणी यंत्रणांकडील त्वरित माहितीचा अभाव हे मुख्य कारण मानले जाते. हेडलीने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला मुंबईतील लक्ष्यांची महत्त्वाची माहिती तसेच चित्रफिती पुरविल्या होत्या.