संपूर्ण विश्वाला एक विशिष्ट अशी गणितीय रचना आहे. इंग्रजी भाषेत WORLD IS MATHEMATICALLY COREECT असे म्हणतात ते उगीच नाही. मनुष्यप्राणी किंवा इतर कुठलीही सजीव वस्तू जी काही कृती करत असते ती कृती आणि तिचे परिणाम हे विश्वात जाणवतात. त्याची स्पंदने, त्या कृतीचे तरंग हे कुठेतरी उमटत असतातच. ज्या व्यक्तीने कृती केली आहे त्यास केलेल्या कृतीची किंवा केलेल्या कर्माची जाण असो अथवा नसो परिणाम हे त्या व्यक्तीस मिळतातच. व्यवस्थापनशास्त्रसुद्धा कर्माचा सिद्धांतच अनुसरत असते. कारण, व्यवस्थापनशास्त्र जरी अदृश्य असले तरीही त्याची अंमलबजावणी मात्र मनुष्यप्राणीच करत असतो. त्यातील कित्येकांना आपण करत असलेली कृती ही योग्य की अयोग्य याची जाणीव नसते. मात्र केलेल्या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ भोगावयास मिळायला जेव्हा सुरुवात होते त्यावेळी केलेले कर्म हे जाणवतेच असे नाही. लौकिक जगतात ज्याला सकारात्मक किंवा नकारात्मक कृती असे आपण म्हणतो त्यास पारमार्थिक भाषेत पाप किंवा पुण्य म्हणत असावेत. मनुष्यप्राण्याशिवाय इतर प्राण्यांना ते करत असलेले कृत्य हे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचे भान नसते. त्यांच्यासमोर मिळालेले जीवन जगणे एवढेच ध्येय असल्याने ते सृजनात्मक कृती करू शकत नाही. परंतु, मनुष्यप्राण्याला बुद्धी आणि विवेक असल्याने तो करत असलेली कृती सकारात्मक आहे की नकारात्मक याची सर्वस्वी जबाबदारी त्याची स्वतःचीच असते. व्यवस्थापन क्षेत्रात का, केव्हा, कुठे, कसे आणि किती या शब्द नव्हे तर संज्ञांचा वापर सातत्याने करावा लागतो. कारण या संज्ञाच उपक्रमाची निवड, नियोजन, कार्यपद्धती आणि सिद्धता ठरवत असतात. जेथे निवड योग्य असत्ते तेथेच नियोजन सुयोग्यरित्या राबवले जाते आणि त्यामुळे उत्कृष्ट कार्यपद्धती अवलंबिली जाते आणि सरतेशेवटी उपक्रमाची सिद्धता होते. व्यवस्थापनशास्त्रात उपक्रमाची निवड म्हणजेच नेतृत्व निवड होय! निवड का करावी? केव्हा करावी? कुठे करावी? कशी करावी? किती प्रमाणात करावी याचा सर्वस्वी अधिकार हा वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना समान असतो. कारण व्यवस्थापनशास्त्र हे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयच नव्हे तर लौकिक आणि पारलौकिक स्तरावर व्यापून उरले आहे. संपूर्ण विश्वात असे काहीच नाही जे व्यवस्थापनशास्त्रात नाही आणि असे सर्व आहे जे व्यवस्थापनशास्त्रात आहे. या व्यवस्थापनशास्त्राच्या खजिन्याची किल्ली मात्र श्रीसमर्थांच्या दासबोधातील तत्त्वज्ञानात आहे. ज्यांना ही किल्ली मिळाली त्यांना व्यवस्थापनशास्त्राचा खजिना केव्हाही उघडता आणि बंद करता येतो. पण, त्याकरिता सातत्याने श्रीमद दासबोध ग्रंथाचे वाचन, मनन आणि चिंतन हवे.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने नेतृत्व ही संकल्पना खूप व्यापक आहे. औद्योगिक संस्थेत किंवा उद्योग समूहात जेव्हा विशिष्ट उद्दिष्टाने अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतात. या व्यक्तीसमूहाला दिशा देण्याचे काम समूहातील काही व्यक्तींकडून केले जाते. अशा दिशा देणाऱया व्यक्तीला किंवा व्यक्तींना समूहाचे नेतृत्व असे म्हणतात. योग्य नेतृत्व मिळाल्यास योग्य दिशा प्राप्त होते. समूहाची संपूर्ण शक्ती त्या दिशेने वळते. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी नीट करता येते. नेतृत्वामुळे उद्योग समूहाचा प्रभाव वाढतो. प्रत्येक उद्योग समूहात एखादी व्यक्ती जाणतेपणाने किंवा अजाणतेपणीही नेतृत्व करत असतेच. उत्तम व्यवस्थापकाचा संबंध हा इतरांकडून काम करवून घेण्याशी येत असल्यामुळे त्याचे यश हे सर्वोत्तम नेतृत्व देण्याच्या क्षमतेवर आधारित असते. आधुनिक काळात नेतृत्व हे व्यवस्थापनक्षेत्रातील प्रमुख कार्य आहे. व्यवस्थापकाने हे कार्य केले तरच व्यवस्थापनास गती प्राप्त होईल. व्यवस्थापनशास्त्रात नेतृत्व निवड करताना कशाप्रकारच्या चुका होतात हे दासबोधात श्रीसमर्थांनी सांगितले आहे. तसेच आळसामुळे आणि बेसावधपणामुळे नेतृत्वास कसा त्रास होतो याचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात की, आळसाचे फळ रोकडे ।जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणौन आवडे ।आळसी लोकां ।। आळस उदास नागवणा ।आळस प्रेत्नबुडवणा । आळसे करंटपणाच्या खुणा ।प्रगट होती ।। म्हणौन आळस नसावा ।तरीच पाविजे वैभवा । अरत्रीं परत्रीं जीवा ।समाधान ।। 10-12-13/03/11 याचा अर्थ असा आहे की, जीवनात आळसाचा परिणाम लगेच दिसतो. माणूस निद्राधीन होतो. आळशी मनुष्याला झोप अत्यंत प्रिय असते. आळस उत्साहाला मारक आहे. आळस नुकसान करतो. आळसामुळे दुर्भाग्य आणि दुर्दैवाच्या खुणा दिसू लागतात. माणसाने आळसास थारा देऊ नये. तरच वैभव प्राप्त होऊन प्रपंच आणि परमार्थात समाधान लाभेल.
व्यवस्थापनशास्त्रात या ओवी प्रत्येक ठिकाणी लागू पडतात. ज्यांना उत्तम नेतृत्व करायचे आहे किंवा उत्तम नेतृत्वाची निवड करायची आहे त्यांनी आळस झटकूनच कार्य करायला हवे. सतत प्रयत्नशील राहणे म्हणजेच सकारात्मकता आणि आळशी राहणे म्हणजेच नकारात्मकता. व्यवस्थापनक्षेत्रात उपक्रमाची निवड आणि उपक्रमातील नेतृत्व निवड करत असताना जर सावधानता बाळगली नाही तर उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. कारण उपक्रमात निवड करत असताना जे बेसावध असतात ते योग्य नियोजन करू शकत नाही. परिणामतः निकृष्ट कार्यपद्धती अवलंबिली जाते आणि ध्येयप्राप्ती होत नाही.
आपल्या हिंदू पुराणातील भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपु आणि भगवान नरसिंह यांची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा पुत्र होता. राक्षसकुळात त्याचा जन्म झाला होता. पण, त्याने भगवान महाविष्णूंची भक्ती प्रचंड प्रमाणात केली. भक्ती करत असताना त्याने आळसाला थारा दिला नाही. अनेक यातना, अडचणी त्याला सोसाव्या लागल्या. शेवटी नरसिंह अवतार प्रगट झाला आणि हिरण्यकश्यपुचा वध झाला. भक्त प्रल्हादाला त्याचा श्रीहरी मिळाला. भक्त प्रल्हाद हा राक्षसकुळात जन्माला आला होता पण त्याने स्वतःच्या वडिलांनी सांगितलेला मार्ग न निवडता हरिभक्तीचा मार्ग निवडला आणि स्वतःसहित राक्षस कुळाचा उद्धार केला. म्हणजेच भक्त प्रल्हादाची नेतृत्व निवड किती योग्य होती हे या गोष्टीतून आपल्याला जाणवते. पुराणातील वानगी पुराणातच असे उपहासाने जे म्हणतात त्यांच्याकरिता भक्त प्रल्हादाची गोष्ट किती व्यवहारिक आहे हे यातून जाणवते.
माधव किल्लेदार