आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर टीका केली तर कार्यकर्त्यांनी त्याच्यापुढे जाऊन चित्रविचित्र घोषणा दिल्या. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे एकमेकांचे हाडवैरी असावेत असे वातावरण निर्माण झाले.
राजकीय नेत्यांकडून आपापल्या धोरणांची मांडणी वेगवेगळ्या पध्दतीने करण्यात येते. विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम पर्यायांचा विचार करण्यात येतो. बोलण्याच्या ओघात काही वेळा कमी अधिक स्वरूपाचे शब्द व्यक्त होतात आणि मग भावनांचा कल्लोळ होतो. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर झाल्याचे देखील दाखवायचे असते. यावरून अशांतता निर्माण होण्याची शक्यता असते.
अलीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत हे नेहमी आपले राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना टिकेचे लक्ष्य बनवत असतात. अलीकडे त्यांनी राणेंच्या शिक्षणावरून काही टिप्पणी केली. यावर माजी खासदार निलेश राणे यांनीही तेवढय़ाच जोराचा प्रतिसाद दिला. राजकीय वर्तुळात क्रिया, प्रतिक्रियांचा मोठा धुरळा उडाला.
गेल्या आठवडय़ात शिवसेना विरूध्द भाजपाचे अप्रत्यक्ष खटके उडत राहिले. वडिलांच्या शिक्षणाबद्दल अनुद्गार काढणाऱया खासदार राऊत यांना पळवून लावण्याविषयी त्यांनी घोषणा केली. यानंतर कार्यकर्त्यांनी आजी-माजी खासदारांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. प्रतिमांना चपलांचे हार घालून लाथाबुक्क्यांनी तुडवलं गेलं. राजकीय नेते जी विधाने करतात त्याच्या पुढे जाऊन कार्यकर्ते वागत असतात. आपल्या नेत्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण किती झोकून देतो हे कार्यकर्त्यांना दाखवायचे असते. त्यातून प्रदर्शने सुरु होतात.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात ठिकठिकाणी आजी व माजी खासदार समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात मोर्चे काढले, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्या, राजकीय वातावरण गरमागरम झाले. तथापि या सर्व निदर्शनामध्ये सामान्य माणसाचा अजिबात सहभाग नव्हता. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात प्रदर्शनबाजी करत होते. हितसंबंधाच्या विणीमुळे कार्यकर्त्यांची बांधिलकी पक्षासाठी घट्टपणे दिसत आहे.समाजकारण पहिले किंवा लोकसेवा पहिली असे म्हणणारे राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात निदर्शने करू लागले. यामध्ये जनहिताचा कोणताच मुद्दा नव्हता. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. रोजगाराच्या नवीन संधी नाहीत किंवा महागाईने कहर केला म्हणून कोणाचा आक्षेप नाही. चांगल्या दर्जाचे धान्य रेशनवर मिळत नाही. म्हणून कोणाचा आक्षेप नव्हता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी म्हणून कोणत्याही कार्यकर्त्याने या निदर्शनामध्ये आवाज दिलेला नाही.
राजकीय विरोध हा व्यक्तिगत विरोधापर्यंत जाऊन पोहोचतो. आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर टीका केली तर कार्यकर्त्यांनी त्याच्यापुढे जाऊन चित्रविचित्र घोषणा दिल्या. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे एकमेकांचे हाडवैरी असावेत असे वातावरण निर्माण झाले. नेत्यांपेक्षा उत्साही कार्यकर्त्यांनी टोक गाठण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उभय बाजूच्या कार्यकर्त्यांना सज्जड इशारा दिला. विशेषतः शिवसेनेच्या लोकांना त्यांनी सांगितले की, अशा स्वरूपाच्या गोष्टीत तुम्ही अडकू नका. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले हे बरेच झाले. खरे तर प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि क्रियेस प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या वेळीच शिवसेना नेत्यांनी अशी भूमिका घेणे गरजेचे होते. कोणाच्यातरी विरोधात असल्याशिवाय कामच करता येत नाही अशी कार्यकर्त्याची परिस्थिती होणे ही अवघड बाब आहे. सामंतांनी वाईटपणा स्वीकारावा लागण्याची भीती असूनही दोन कटू शब्द सुनावले हे उल्लेखनीय आहे.गाव पातळीला कोणत्याही कामासाठी तलाठय़ाची भेट हवी म्हटले तर ती भेट सहजासहजी होत नाही. रेशनकार्ड दुरूस्ती अथवा नवे रेशनकार्ड हवे असेल तर खेपा घालाव्याच लागतात. 7/12 वर नव्या नोंदी करायच्या असतील तर किती खेपा घालाव्या लागतील याचा पत्ता नाही. अशा एक ना अनेक कितीतरी बाबी आहेत की ज्यात जनहित अडकले आहे. पोलिसांकडे काही बाजू मांडायची असेल तर कुणा नेत्यांना घेऊन जायलाच हवे असा समज लोकांमध्ये पसरला आहे. या साऱयावर व्यवस्था सुधारणेकरीता राजकीय कार्यकर्त्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात शिवसेना त्याचप्रमाणे राणे कुटुंबिय हे निश्चितच दखलपात्र आहे. या दोन्ही राजकीय गटांचे एकमेकांशी संघर्षाचा इतिहास मोठा आहे. प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याची उदाहरणे अनेकदा नोंदवली गेली आहेत. लोकांनी आता अशा वाद विवादांकडे लक्ष देण्याऐवजी प्रश्नांबद्दल बोला म्हणून नेत्यांकडे आग्रह धरला पाहिजे. राजकीय नेत्यांचे अहंकार सुखावण्यासाठी कार्यकर्त्यांचे खेळ चालू देता कामा नयेत. नेत्यांच्या मागे जाऊन आंदोलनात उडी घेणे, प्रतिकात्मक प्रेत यात्रेसारख्या बाबीच्या आंदोलनात उतरून दाखल गुह्यांना तोंड देणे कदाचित आज कार्यकर्त्यांना चांगले वाटेल पण न्यायालयात जशा तारखा पडू लागतात आणि त्यासाठी खेपा घालाव्या लागल्या की कार्यकर्त्यांना वस्तुस्थितीची जाण येते. छोटय़ा व दुर्लक्षित कराव्या अशा बाबींवर मैदानात आवाज देण्याऐवजी धोरणांवर व अकार्यक्षमतेवर बोल ठेवले गेल्यास त्यातून निश्चितपणे जन†िहत साधेल. नाथ पै, मधू दंडवते यांच्यापासून ते सुरेश प्रभूंपर्यंत अनेकांनी येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. दिल्लीत जाऊन केवळ या मतदारसंघाचीच गाऱहाणी नव्हेत तर देशाच्या प्रश्नांना हात घालण्याची कामे या लोकांनी पार पाडली. त्याच लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी खासदार व त्यांचे समर्थक किरकोळ विधानांवरून एकमेकांच्या विरोधात लढायला उठतात हे शोभेचे नसल्याचे मत येथील सामान्य व्यक्त करत आहेत.
सुकांत चक्रदेव