उचगांव / वार्ताहर
प्राधिकरणाने नोटीस देवूनही वळिवडे (ता.करवीर )येथील गट क्रमांक १९४/१/अ जागेमध्ये विनापरवाना बांधकाम सुरु ठेवल्याबद्दल मुरलीधर बचाराम कट्यार, सुनिल बचाराम कट्यार, श्रीचंद बचाराम कट्यार, लखमीचंद बचाराम कट्यार, राजेश बचाराम कट्यार (सर्वजण रा. वळिवडे, ता. करवीर) आणि पुंडलिक बाळाराम सरावणे (रा. बापट कँप, कोल्हापूर) यांच्याविरोधात गांधीनगर पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे नगर रचनाकार दिलीप आण्णासो कदम यांनी ही फिर्याद दिली. या बाबतची माहिती अशी की, वळिवडे येथील गट क्रमांक १९४/१/अ मधील जागेमध्ये बांधकाम सुरु होते.
या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आल्याने प्राधिकरणचे नगर रचनाकार दिलीप कदम यांनी सदर बांधकाम योग्य ते परवाने घेऊन सुरु करावे. अशी नोटीस या बांधकामाच्या जागेवर चिकटविली होती. तरीही या ठिकाणी बांधकाम सुरु होते. या बांधकामाबाबत विचारणा केली असता पुंडलिक सरावणे यांनी सांगितले की मुरलीधर कट्यार, सुनिल कट्यार, श्रीचंद कट्यार, लखमीचंद कट्यार आणि राजेश कट्यार यांनी बांधकामास सर्व परवानग्या घेतल्या असून त्यांनी बांधकाम सुरु ठेवा असे सांगितले आहे.
हे विनापरवाना बांधकाम थांबवावे अशी नोटीस देवूनही बांधकाम चालू असल्याने फिर्याद विकास प्राधिकरणचे दिलीप कदम यांनी दिल्यानंतर याबाबत गांधीनगर पोलीसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन गवळी करत आहेत.