नेताजी जाधव यांचे प्रतिपादन : शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना अभिवादन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग म्हैसूरला जोडण्यात आला. यामुळे बेळगावसह सीमाभागात प्रचंड गोंधळ माजला. अनसुरकर गल्ली येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा मधू बांदेकर गतप्राण झाले. या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळेच 66 वर्षे मोठय़ा जिद्दीने सीमालढा सुरू आहे. जोवर सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळणार नाही तोवर हा लढा असाच सुरू राहील, अशी ग्वाही माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी दिली.
कचेरी गल्ली शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील 66 वर्षांपासून लोकशाही मार्गाने सीमालढा सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढा दिला जात आहे. त्यामुळे कोणीही आक्रमक न होता या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल, यासंदर्भात प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी सीमावासियांना केले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या हस्ते मधू बांदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेवक रवी साळुंके यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती चतूर यांनी केले.
यावेळी हुतात्मा मधू बांदेकर यांचे बंधू रमेश बांदेकर, विष्णू जांगळे, हेमंत जांगळे, विजय बांदेकर, कपिल कडोलकर, सुशांत जांगळे, राहुल घगवे, विनायक बांदेकर, माजी नगरसेवक विजय भोसले, मनोहर हलगेकर, विजय हलगेकर, बाळू चापगावकर यांच्यासह इतर उपस्थित होते.