व्यापारी संघटनेचे खजिनदार गोपाळ नाईक यांचा आरोप : सर्व दुकाने खुली करायला लावताना संघटनेला विश्वासात घेतले नाही
प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील न्यू मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल संघटनेचे खजिनदार गोपाळ नाईक यांनी नाराजी व्यक्त केली असून संघटनेच्या पदाधिकाऱयांना विश्वासात न घेता त्यांनी मनमानी कारभार चालविला असल्याची टीका केली आहे.
मंगळवारी बाजारातील सर्व दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय अध्यक्षांनी स्वतःच घेतला असावा. यासंदर्भात संघटनेला विश्वासात घेतले नव्हते. संघटनेवर जवळपास 28 पदाधिकारी असून अलीकडच्या काळात आपल्या मर्जीतील दोन-तीन पदाधिकाऱयांना सोबत घेऊन शिरोडकर निर्णय घेत आहेत, असा दावा नाईक यांनी केला.
सोमवारी न्यू मार्केटमधील व्यापाऱयांना मंगळवारी सर्व दुकाने खुली ठेवा असे सांगण्यापूर्वी संपूर्ण संघटनेला यासंदर्भात विश्वासात घेणे आवश्यक होते. बाजारपेठ पालिकेच्या मालकीची आहे. सध्या कोव्हिड-19 मुळे काही निर्बंध आले असून जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसार पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना व नगराध्यक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे क्रमप्राप्त असल्याचे नाईक यांनी नजरेस आणून दिले. मात्र अध्यक्ष शिरोडकर हे मनमानी करून आपले निर्णय व्यापाऱयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिरोडकरांच्या आगावूपणामुळे मार्केटला टाळे
पालिकेने याआधी न्यू मार्केटातील किराणामालाची दुकाने तीन तास, तर फळ-भाज्या व बिस्कीट, फरसाण तसेच अन्य खराब होऊ शकणाऱया मालाची दुकाने दोन तास खुली ठेवण्यास मुभा दिली होती. त्यानुसार सुरळीतपणे व्यवहार सुरू होते. मात्र शिरोडकर यांनी मध्यंतरी विक्री करण्यास परवानगी नसूनही आपले तयार कपडे व अन्य साहित्याचे दुकान खुले ठेवले आणि दुसऱयाच दिवशी मारवाडी व्यापारी व अन्य दुकानदारांना दुकाने खुली ठेवण्यास चिथावले, असा दावा नाईक यांनी केला. या प्रकारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याने मुख्याधिकाऱयांनी आक्षेप घेतला होता व जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व मार्केटला टाळे ठोकले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्यापाऱयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न का ?
आम्ही स्थानिक गोमंतकीय व्यापाऱयांना घेऊन स्थानिक आमदार दिगंबर कामत यांची भेट घेतली होती आणि किराणामाल व अन्य आवश्यक वस्तूंची दुकाने खुली करण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी जिल्हाधिकारी व पालिकेने पांढरी व पिवळी रेषा आखून आळीपाळीने व्यवसाय करू दिल्यावर व्यवसाय योग्यरीत्या सुरू होता. असे असताना सर्व दुकाने खुली करण्यास सांगून अध्यक्षांनी पुन्हा व्यापाऱयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. जर आज जिल्हाधिकाऱयांनी बाजारपेठ पुन्हा सील केली असती तर, असाही प्रश्न त्यांनी केला.
आपण व्यापाऱयांचा प्रतिनिधी असून व्यापाऱयांच्या हिताची आपणास चिंता आहे. कोव्हिडमुळे काही निर्बंध आले असले, तरी त्यांची झळ व्यापाऱयांनाच नव्हे, तर सर्व क्षेत्रांना बसली आहे. त्यामुळे काही वेळ कळ सोसणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्या व ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे, हे त्यांनी नजरेस आणून दिले.