पंजाब/प्रतिनिधी
लस न घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीची रजा देण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी केली. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी जे वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले नसतील त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. तसेच राज्यातील लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी हा उपाय लागू केला आहे. असे पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
शुक्रवारी झालेल्या उच्च स्तरीय व्हर्च्युअल कोविड -१९ आढावा बैठकीत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी या बैठकीत लसीची प्रभावितता समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. लस सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आणि जे लस घेण्यास टाळा टाळ करत असतील त्यांना लसीचा पहिला डोस घेईपर्यंत रजेवर जाण्यास सांगितले जाईल, असे पंजाब सरकारने घोषित केले आहे.
बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी साप्ताहिक आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याच्या अधीन राहून चार आठवड्यांपूर्वी लसीचा किमान एक डोस घेतलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर शालेय कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली. तर, ज्यांना सह-आजार आहेत त्यांना फक्त एकदाच परवानगी दिली जाईल जेव्हा त्यांचे करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण होतील.