प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वेतोरे मिरमेवाडी येथील प्रगतशील आंबा बागायतदार शेतकरी मधुकर जयराम गावडे (80) यांच्या निधनानंतर त्यांच्या बाराव्या दिवशी गावडे परिवाराकडून पणदूर येथील संविता आश्रमातील सर्व निराधारांना अन्नदान करून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.
वडील जाण्याचे दु:ख तर आहेच, परंतु वडिलांनी समाजसेवा करणे, लोकांना मदत करणे, एकत्र कुटंब बांधून ठेवून अन्नदान करणे असे चांगले संस्कार केले. हे संस्कार जोपासून सामाजिक बांधिलकी जपल्यास वडिलांना खऱया अर्थाने श्रद्धांजली ठरेल हे जाणून घरामध्ये लोकांना बोलावून अन्नदान करण्यापेक्षा अनाथांना अन्नदान केल्यास कोरोनाचा संसर्गही टाळता येईल आणि अनाथाश्रमाला मदतही होईल, या उद्देशाने आश्रमात अन्नदान करण्याचे मधुकर गावडे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले त्यांचे सुपुत्र प्रमोद गावडे यांनी ठरविले. आपल्या परिवारात ही कल्पना त्यांनी सांगताच सर्वांनाच ती आवडली आणि त्यांनी पणदूर येथे संविता आश्रम चालवणारे जीवन आनंद संस्थेचे सचिव संदीप परब यांच्याशी संपर्क साधून आश्रमात अन्नदान करायचे आहे, असे सागितले. संविता आश्रमामध्ये 125 निराधार लोक आहेत, अशी माहिती परब यांनी देताच गावडे परिवाराने लगेच होकार दिला आणि सर्व प्रकारचे धान्य संविता आश्रमाला दिले आणि वडिलांच्या बाराव्या दिवशी वेतोरेच्या गावडे परिवाराने संविता आश्रमातील 125 निराधारांना अन्नदान करीत वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.