बारावीबरोबरच अकरावीचे विद्यार्थी दाखल झाल्याने पदवीपूर्व महाविद्यालयीन कॅम्पस बहरले
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीत अखेर प्रतीक्षा.. उत्सुक्तेनंतर महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी असणारे पदवीपूर्व प्रथम वर्ष अर्थात अकरावीच्या शैक्षणिक वर्षाला ऑफलाईन प्रारंभ झाला आहे. नवीन महाविद्यालयीन परिसर, नवीन वर्गमित्र, नवीन शिक्षकवर्ग आणि नवीन शैक्षणिक वाटचाल यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र नव्या शैक्षणिक वाटचालीची स्वप्ने पाहत महाविद्यालयाचा पहिला दिवस तितकाच आनंददायी ठरल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. बारावीबरोबरच अकरावीचे विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाल्याने सकाळपासून पदवीपूर्व महाविद्यालयीन कॅम्पस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने बहरून गेले.
2020-2021 हे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे लांबणीवर पडले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी तितकेसे प्रभावी नसल्याने ऑफलाईन वर्गाची प्रतीक्षा होती. दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. जून महिन्यात सुरू होणारे अकरावीचे वर्ग फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्याने दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्याच दिवशी महाविद्यालयात 75 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. कोरोनाचे संकट धूसर झाले असले तरी अजून टळलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, मास्कची सक्ती आणि सामाजिक अंतराचे भान या नियामांचे पालन करूनच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.
1 जानेवारी रोजी बारावीचे वर्ग सुरू होताच अकरावीच्या विद्यार्थ्यांना आपले वर्ग केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा होती. यामुळे महाविद्यालयाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने बहरून गेला. यामुळे अध्यापनात सातत्य राखण्याबरोबरच अभ्यासक्रम शिकविण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आल्याचे दिसून आले. पहिला दिवस कसा होता, याबाबत पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.
कॉलेजच्या वाटचालीत सातत्य रहावे – वसुधा सांबरेकर
महाविद्यालयाचा पहिला दिवस लॉकडाऊननंतर आनंद देणारा ठरला. नवीन वातावरणात सर्व नवीनच अनुभव आहेत. करिअरची वाटचाल म्हणून महाविद्यालयीन शिक्षण खूप गरजेचे असते. यामुळे अखेर अनेक महिन्यांच्या विलंबाने सुरू झालेल्या कॉलेजच्या वाटचालीत सातत्य रहावे, अशी अपेक्षा वसुधा सांबरेकर हिने व्यक्त केली.
महाविद्यालय सुरू झाल्याने समाधान – आकांक्षा पाटील
दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश एक वेगळीच उत्सुकता होती. मात्र अखेर दहा महिन्यांच्या विलंबाने महाविद्यालये गजबजली आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र समजून घेताना अडचणी येत होत्या. महाविद्यालयात आल्यानंतर प्राध्यापक वर्गाने न समजलेला तसेच कठीण वाटणारा पाठय़क्रम समजावून दिल्याने समाधान वाटत असून आनंद होत आहे, असे मत आकांक्षा पाटील हिने व्यक्त केले.
पहिला दिवस पुढील वाटचालीस महत्त्वाचा ठरणार – समर्थ लोहार
गेल्या दहा महिन्यांपासून घरात राहून कंटाळलेले असताना आजचा पहिला दिवस खऱया अर्थाने महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस महत्त्वाचा ठरला. लॉकडाऊन काळात रोजचा दिनक्रमच नसल्याने संपूर्ण आयुष्याची शिस्त गमावून बसलो होतो. ऑनलाईन तास होत होते. मात्र आमच्या अभ्यासात सातत्य नव्हते. आज पहिला दिवस थोडासा गोंधळ झाला. मात्र प्राध्यापकांनी सावरले, असे मत समर्थ लोहार याने व्यक्त
केले.
करिअरची वाटचाल खऱया अर्थाने सुरू झाली – प्राची पाटील
कॉलेज सुरू झाल्यामुळे खरचं खूप बरं वाटतयं. कारण आता अभ्यासात सातत्य येणार असून करिअरची वाटचाल खऱया अर्थाने सुरू झाली आहे. कोरोना, लॉकडाऊन आणि ऑनलाईन शिक्षण यामुळे अक्षरशः कंटाळा आला होता. आज नवीन वातावरणात आल्यानंतर प्राध्यापकांचे सहकार्य आणि नव्या मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंद होत असल्याचे मत प्राची पाटील हिने व्यक्त केले.