फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार : उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्या अनुषंगाने यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षांविषयी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा 1 ते 30 जुलै या दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
समितीने दिलेल्या अहवालाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतल्याचे सांगून सामंत पुढे म्हणाले, जर महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन वाढला, तर पुन्हा एकदा 20 जूनपर्यंत या विषयी फेरआढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्सही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी 50 टक्के ग्रेड ही अंतर्गत मूल्यमापनावर आधारित व 50 टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांबाबत 100 टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मूल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्याला ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला, तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल. पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णयही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही तसेच शैक्षणिक वर्षाचेही नुकसान होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचे शंकानिरसन करण्यासाठीचे सेल कार्यरत करावे, अशा सूचना देऊन सामंत यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी व पालक यांच्या समुपदेशनासाठी जिल्हय़ात केंद्र स्थापन करावे. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी 1 ते 30 जुलै दरम्यान परीक्षा होणार आहेत, हे नजरेसमोर ठेवून अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घराबाहेर न पडता घरातच राहावे. उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असेही सुचविले आहे.
शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून!
यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे 1 सप्टेंबरपासून सुरू करायचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करीत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंनी सहमती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते, असे गृहित धरूनच त्यांची उपस्थिती लिहिण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.