मोदी सरकारचा निषेध : शेतकऱयांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका
चंदीगढ / वृत्तसंस्था
मोदी सरकारने शेतकऱयांची फसवणूक केल्याचा आरोप करत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱयांसाठी घातक आहेत. मोदी सरकार शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याने मी सरकारच्या धोरणाचा निषेध करत पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मोदी सरकारने शेतकऱयांची फसवणूक केली आहे. हे कृषी कायदे त्यांच्या सोयीचे नाहीत. मी आज जो काही आहे तो लोकांमुळे आहे. लोकांनी मला निवडून दिले आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकऱयांचा समावेश आहे. आज त्या शेतकऱयांनाच मोदी सरकारकडून फसवले जात आहे. अशा स्थितीत पद्मविभूषण पुरस्कार स्वतःजवळ ठेवण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नसल्यामुळे मी तो परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बादल यांनी स्पष्ट केले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवत रालोआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाशसिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कायद्यांचा निषेध नोंदवत सध्या पंजाब, हरियाणामधील शेतकऱयांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. सरकारने संमत केलेले नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने आणलेले कायदे जाचक आहेत असे म्हणत अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.