अरविंद केजरीवाल यांचे गोमंतकीयांना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सलग निवडणुका लढणाऱया परंपरागत पक्षांना पाठिंबा देणे गोमंतकीयांनी थांबवावे आणि प्रामाणिक पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
दोन दिवसांच्या गोवा दौऱयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन केले तरी गोवा आणि येथील लोकांना त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने 27 वर्षे आणि भाजपने 15 वर्षे राज्य केले आहे, आणि त्याच पक्षांना पुढील पाच वर्षे दिल्यास काहीही बदलणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.
विद्यमान भाजप सरकारच्या भोंगळ कारभारामुळे राज्यावर 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याच पक्षाला पुन्हा संधी दिल्यास हे कर्ज पाच वर्षांत 50 हजार कोटी आणि नंतर 1 लाख कोटी रुपये होईल. परिणामी प्रत्येक गोमंतकीय कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाईल. याऊलट आपला संधी मिळाल्यास संपूर्ण कर्ज फेडून राज्याला कर्ज मुक्त करेल, असे ते म्हणाले.
त्यामुळे यावेळी मतांचे विभाजन होऊ देऊ नका. आपवर विश्वास ठेवा. आम्ही दिल्लीत जे वचन दिले ते पाळले आहे. गोव्यातही आम्ही दिलेले प्रत्येक वचन आणि हमी पूर्ण करणार आहोत, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.