ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन च्या या काळात महाराष्ट्रात जवळपास सहा लाख कामगार आणि मजदुर अडकले आहेत. या मजदुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी विशष ट्रेनची व्यवस्था करण्याचा विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
केंद्राने विशेष ट्रेन सोडल्यास अडकून पडलेले मजूर आणि कामगार त्यांच्या घरी जाऊ शकतील. या बाबत मार्गदर्शन सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाने एप्रिल अखेर पर्यंत द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा असं ही त्यांनी म्हटले आहे.