प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळही अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्मचाऱयांनी 15 दिवस संप पुकारल्याने उत्पन्नावर परिणाम झाला होता. दरम्यान, परिवहन मंडळात सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांना एप्रिल महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. बेळगाव विभागातील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचारी अडचणीत आले आहेत.
संप आणि लॉकडाऊनमुळे परिवहनच्या सर्व बस जागेवर थांबून आहेत. त्यामुळे परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, बेळगाव विभागाला बससेवा ठप्प असल्याने दैनंदिन 60 लाखांचा महसूल थांबला आहे. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने निधीची कमतरता जाणवत आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांना संप काळातील वेतन दिले जाणार नाही, असे परिवहनने स्पष्ट केले आहे.
बेळगाव आगारातील 3329 कर्मचाऱयांच्या वेतनासाठी महिना 10 कोटींची गरज असते. मात्र, संप व लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचा स्रोत थांबून परिवहनचे आतापर्यंत 968 कोटींचे नुकसान झाले आहे. गतवषी दोन महिन्यांहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प होती. दरम्यान, परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. परिवहनच्या मदतीला राज्य सरकार धावून आले होते.