शहरातही वाद पेटला; विद्यार्थिनींकडून महाविद्यालयासमोर गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
आठवडाभरापासून सुरू असलेल्या हिजाबवादाचे पडसाद बेळगाव शहरातही उमटू लागले आहेत. सोमवारी सरदार्स हायस्कूलमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच महाविद्यालये सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी येथील लिंगराज महाविद्यालयासमोर सात विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. परीक्षा नको पण हिजाब हवा असे सांगत त्या विद्यार्थिनींनी परीक्षेवर बहिष्कार घातला.
आठ दिवसानंतर पुन्हा बुधवारी महाविद्यालये गजबजली. अनुचित घटना टाळण्यासाठी सर्वच महाविद्यालयांना कडक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.
येथील लिंगराज कॉलेजमध्ये सकाळी सात विद्यार्थिनींनी हिजाब घालून आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडविल्यानंतर काही वेळात त्यांनी घर गाठले.
दरम्यान, त्यांना हिजाब उतरवून परीक्षेला बसण्यास सुचविण्यात आले होते. घरी परतलेल्या विद्यार्थिनी पुन्हा पालकांसह प्रवेशद्वारावर आल्या. त्यांच्यासह त्यांच्या पालकांना प्रवेशास मज्जाव केल्याने गोंधळ उडाला.
आमच्या पाल्यांना परीक्षेस का बसू दिले नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. न्यायालयीन आदेश असल्याने हिजाब परिधान करणे अयोग्य असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिणामी गोंधळात भर पडली. तोपर्यंत परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थिनींनी तेथून काढता पाय घेतला. पण प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्हाला परीक्षापेक्षा हिजाब महत्त्वाचा असल्याचे मत मांडले. काही काळ तणावाचे वातावरण होते.
लिंगराज कॉलेजमधील प्रकार वगळता शहरातील बहुतेक महाविद्यालयात शांततेत वर्ग चालले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नेहमीप्रमाणे विद्यार्थी अभ्यासात व्यग्र होते. तब्बल आठ दिवसानंतर शहरातील महाविद्यालयातील कॅम्पस बहरलेले दिसले. दरम्यान लिंगराज कॉलेजच्या समोर घडलेला प्रकार चिंताजनक व तितकाच संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. इतर विद्यार्थ्यांनी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. एकंदर हिजाबवादाचे पडसाद शहरातही उमटू लागल्याने पोलीस, शिक्षण खाते आणि महाविद्यालय प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
घटनेबाबत संभ्रम
सदर सात विद्यार्थिनींना सुरुवातीला स्टाफरुममध्ये हिजाब उतरवून परीक्षेला बसण्यास सुचविण्यात आले होते. पण त्यांनी स्वतःहून नकार देत घरी जाणे पसंत केले. परंतु काही वेळातच पुन्हा या विद्यार्थिनी त्यांच्या पालकांसह प्रवेशद्वारावर येऊन गोंधळ घालू लागल्या. त्यांच्याकडे ओळखपत्रेही नव्हती. त्यामुळे त्या विद्यार्थिनीच होत्या का? याबाबत साशंकता असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.